मुंबई : शिक्षण विभागाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यपामन नेमके कसे करावे? अकरावी प्रवेश नेमका कोणत्या निकषांवर द्यावा, याबाबत विचार विनिमय सुरु आहे. यामध्ये राज्यातील दहावीचा वर्ग असलेल्या विविध शाळांचे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून केले जात आहे. 


अंतर्गत मूल्यमापनासाठी सर्वेक्षणाअंती राज्यातील 17 हजार 743 शाळा तयार असून 3 हजार 683 शाळांनी आपली तयारी नसल्याचे सांगितले आहे. एकूणच अंतर्गत मूल्यमापनासाठी सहभागी झालेल्या एकूण 21 हजार 426 शाळांपैकी 82.81 टक्के शाळा या अंतर्गत मूल्यमापनासाठी तयार आहेत. तर 17.19 टक्के शाळांनी आपली तयारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. 


तर दुसऱ्या सर्वेक्षणात दहावीच्या 3 लाख 1 हजार विद्यार्थ्यांचे प्रतिसाद सर्वेक्षणासाठी प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यातील 2 लाख विद्यार्थी स्वतंत्र परीक्षेसाठी तयार असून 1 लाख 8 हजार विद्यार्थ्यांनी यासाठी नकार दर्शविला आहे. एकूणच प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 35.02 टक्के विद्यार्थ्यांना स्वतंत्र सीईटी परीक्षा नको तर 64.98 टक्के विद्यर्थी यासाठी तयार आहेत.  त्यामुळे आता यावर शासन काय निर्णय घेणार? हा प्रश्न कसा सोडवणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 


आता सर्वेक्षण अहवाल शासनाकडे सुपूर्द केला असून ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाची तयारी नसल्याचं सांगितले आहे. त्याबाबत काय निर्णय घेणार, काय पर्याय समोर आणणार? शिवाय अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी की नाही याबाबत सुद्धा अधिकृत निर्णय होईल.


दरम्यान, दहावी विद्यार्थ्यांसाठीची अकरावी प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने जुलै महिन्यात किंवा राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घेण्याचे नियोजन असल्याच शिक्षण विभागकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शिक्षण विभाग दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नसल्याने अंतर्गत मूल्यमापणासाठी नेमके काय निकष अवलंबावे याबाबत विचार विनिमय करत आहे. विविध शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर सुद्धा लवकर तोडगा काढण्याचे काम सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :