![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मास्क न घातल्याने मुंबईत पहिल्या गुन्ह्याची नोंद, काय शिक्षा मिळणार?
मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांची वाढती संख्या पाहून बीएमसी प्रशासन वैतागलं आहे. त्यातच मास्क न घातल्याबद्दल मुंबईत पहिला गुन्हा नोंद झाला आहे.जनजागृती करुनही नियमांचं पालन न केल्याने, मास्क न वापरल्याने मुंबई महापालिकेने दंडाची रक्कम वाढवण्याचाही विचार केला आहे.
![मास्क न घातल्याने मुंबईत पहिल्या गुन्ह्याची नोंद, काय शिक्षा मिळणार? BMC lodged first FIR in Mumbai over not wearing mask मास्क न घातल्याने मुंबईत पहिल्या गुन्ह्याची नोंद, काय शिक्षा मिळणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/16135600/Mask.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत मास्क न घातल्याबद्दल पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. विनामास्क फिरणाऱ्या एका बेजबाबदार नागरिकावर मुंबई महापालिकेने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिका आता विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये राहुल मधुकर वानखेडे नावाच्या 28 वर्षीय तरुणाविरोधात बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आरोपी मास्कशिवाय फिरत होता. त्यावेळी बीएमसीच्या टीमने आरोपीला रोखून मास्क न घातल्याने विचारणा केली. परंतु त्याने कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची आणि उद्धट उत्तरं दिली. यानंतर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कलम 186 आणि कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
दंडाची रक्कम वाढवण्याचा बीएमसीचा इशारा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजारांच्या पार पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 9 हजार 500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्या मुंबईसह राज्यभरात मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. बीएमसीने मास्कबाबत "नो मास्क नो एंट्री" हे अभियान राबवलं आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर बीएमसीने 200 रुपयांचा दंडाची तरतूद केली आहे. परंतु मास्क न वापरण्याचं प्रमाण जास्त दिसू लागलं तर दंडाची रक्कम वाढवण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई "मुंबई महापालिकेने आतापर्यंत मास्क न घालणाऱ्या 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करुन एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दंडाची रक्कम वसूल केली आहे," अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली. "सध्या मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 रुपये दंड आकारला जातो. मात्र, मुंबईकर जर असेच बेशिस्त राहिले तर दंडाची रक्कम वाढवण्याचा विचार होऊ शकतो," असंही सुरेश ककाणी म्हणाले.
मास्क न वापरल्यास तुरुगंवासाची शक्यता साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 च्या कलम 3, अंतर्गत दिलेले आदेश न पाळल्यास दंडाची कारवाई करण्याची तरदूत आहे. यामध्ये कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली जाते. या गुन्ह्यात ठरविक काळासाठी तुरुंगावास जो एक महिन्याचा असू शकतो किंवा 200 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. काही प्रकरणात दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)