मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीच रुपडं लवकरच बदलणार आहे. एकेकाळी मुंबईचं लक्ष केंद्रित करणारी दगडी चाळ येथे टोलेजंग इमारत उभारण्यात येणार आहे. लवकरच दगडी चाळ येथे पुनर्विकास करण्यात येणार असून म्हाडाने यासाठी हिरवा कंदील दिला आहे. ज्यामुळे येणाऱ्या दिवसात येथे चाळी नसून मोठे टॉवर बांधण्यात येणार आहेत.


दगडी चाळ मुंबईतील भायखळा येथील उभ असलेलं अंडरवर्ल्ड डॅान अरुण गवळीचं साम्राज्य. जिथे 1970-80 च्या दशकामध्ये जवळपासच्या परिसराच्या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार राहायचे. पण, त्यानंतर मात्र ते माफिया गुंड अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे. दगडी चाळ हा डॅान अरुण गवळीचा किल्ला कसा बनला, ज्या इमारतीच्या मालीने भले मोठी लोकं घाबरतात त्या इमारतींचा इतिहास काय? यामागेही काही रंजक संदर्भ दडलेले आहेत. 


ओळख डॉन ते राजकारणी अरुण गवळी यांची.... 
अरुण गुलाब अहिर उर्फ अरुण गवळी उर्फ डॅडी म्हणून ओळखला जाणारा, अंडरवर्ल्ड डॉन, माजी गुंड आणि आता एक भारतीय राजकारणी. 1970 च्या दशकात गवळी आणि त्याचा भाऊ किशोर (पप्पा) मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दाखल झाले जेव्हा ते भायखळा, परळ आणि सात रास्ता या मध्य मुंबई भागात कार्यरत असलेल्या रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वात असलेल्या “भायखळा कंपनी” मध्ये दाखल झाले. 1988 मध्ये, रामा नाईक पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर, गवळी यांनी ती टोळी ताब्यात घेतली आणि दगडी चाळ या त्यांच्या निवासस्थानापासून आपली गँग चालू केली. त्याच्या नियंत्रणाखाली या टोळीने मध्य मुंबई भागातील बहुतेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवले. ऐंशी आणि नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात, गवळीची टोळी दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी टोळीशी सामर्थ्य संघर्षात सहभागी झाली होती.



मुळच्या खंडवा, मध्यप्रदेश मधील गवळी याचे वडील मुंबईत आले. 1970-80च्या दशकामध्ये गवळी परळ, लालबाग, भायखळा परिसरातील मिल मध्ये काम करायचा. मिलचा संप झाला आणि त्या बंद पडल्यामुळे अनेक लोकं बेरोजगार झाली ज्यात मोठ्या संख्येत युवा वर्गही होता. दगडी चाळीतील अशाच बेरोजगार लोकांसोबत गवळीने चाळीतून आपली गँग चालवायला सुरूवात केली. या दगडी चाळीत अरुण गवळीचा दरबार लागायचा जिथे गवळी गँग लोकांचे सेटलमेंट, पैशांचा व्यवहार आणि इतर सर्व कामं चालायची.  


अंडरवर्ल्ड गॅंगवॅार, पोलिसांशी रोज होणारी चकमक, अटक आणि एंकांउटर होण्याची भीती या सगळ्यापासून वाचण्यासाठी अरुण गवळी आणि त्याच्या गॅंगला एका किल्ल्याची गरज होती आणि भायखळ्यातील या दगडी चाळीनेच अरुण गवळीला आज पर्यंत जिवंत ठेवलं. 


सामनातील वरिष्ठ पत्रकार, प्रभाकर पवार यांच्या मते ‘अरुण गवळी गँगमधील गुंड क्राईम करुन आश्रय घेण्यासाठी दगडी चाळीत यायचे. तिथे लपून रहायचे. पोलिसही त्यांना तिथे पकडू शकत नव्हते, कारण त्यांना आधीच पोलीस रेडची माहिती मिळायची. दगडी चाळ या नावाचा एक वेगळा दबदबा होता. लोकं अरुण गवळीच्या नावा ऐवजी दगडी चाळकडून निरोप आलाय असं म्हणायचे आणि भलेभले घाबरायचे’


चाळीचे अंतरंग
दगडी चाळीत एकूण 10 इमारती आहेत, ज्या पैकी दोन इमारतींमध्ये अरुण गवळीचं गीताई म्हणून घर आहे. तर इतर इमारती या रहिवाशी चाळी आहेत. या दहा इमारती 2000 साली अरुण गवळी चाळीचे मुळ मालक यांनी एका मुस्लीम व्यावसायीकाकडून अंदाजे 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्या. 


1980-90च्या दशकामध्ये अरुण गवळी ने याच दगडी चाळीतन आपली गवळी गँग चालवली. अरुण गवळी ने दगडी चाळीत एक तपास रुम, एक सेटलमेंट रुम आणि तळ घर बांधलं होतं. तपास रुममध्ये गवळी गँग इतर गँगच्या गुंडांना आणून त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करुन त्यांच्याकडून शत्रू गँगची माहीती घेत. तर सेटलमेंट रुम मध्ये बिल्डर, व्यापारी अशा लोकांना बोलून खंडणी घेत किंवा त्यांच्या प्रकरणाचं सेटलमेंट करण्यासाठी पैसे घेत. तर तळ घर हे गवळीने लपण्यासाठी बनवलेली एक खास रुम होती 


अरुण गवळीने तळ मजल्याच्या काही घरांतून एक भुयारी मार्ग बनवला होता. खोलीच्या आत किचनच्या ओट्या खाली जिथे सिलेंडर ठेवलं जायचं तिथे सिलेंडरच्या खाली एक बोगदा केला जायचा तिथून खाली तळ घरात जाण्याचा रस्ता असे. याच तळ घरात लपून गवळी पोलीस, गँगस्टर यांच्याहून स्वताला वाचवून ठेवायचा. 


दगडी चाळीतील लोकं अरुण गवळीच्या मदतीला नेहमी धावायचे. त्याकाळी पोलिसांमध्ये देखील गवळीचे खबरी होते. जे त्याला पोलीस रेड आणि इतक माहिती पुरवत होते.  याच माहीतीच्या आधारे आणि चाळीतील लोकांच्या मदतीने गवळी अनेक वेळा पोलिसांच्या तावडीतून सुटायचा. 


Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 


एक किस्सा असाही... 
एक किस्सा असा ही आहे की गवळी रोज रात्री त्याचं झोपण्याचं ठिकाण बदलायचा. रोज रात्री गवळी चाळीतील दुसऱ्या रहिवाश्यांच्या खोली मध्ये जाऊन झोपायचा. आणि त्या घरातील लोकांची राहण्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्यात यायची. गवळीचा विचार होता की जर त्याच्यावर रात्री हल्ला झाला किंवा पोलीस त्याला पकडण्यासाठी आली तर तो त्यांना कधीच सापडणार नाही.


पण गवळी जुलै 1989 ला पहिल्यांदा दगडी चाळीत पकडला गेला. वरिष्ठ पत्रकार प्रभाकर पवार तो किस्सा सांगतानाच म्हणातात ‘आयपीएस अधिकारी अरविंद इमानदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इन्सपेक्टर सुरेश वालीशेट्टी आणि त्यांच्या टीम ने त्या दिवशी दगडी चाळीत धाड टाकली. माहिती मिळाली होती की गवळी एका लाल गाडी मध्ये दगडी चाळीत आला आहे. गवळी टोळीचे  6 वॉंटेड गुंड मिळाले पण गवळी नाही. सतीश वालीशेट्टी यांना ती लाल रंगाची गाडी दिसली त्यांना कळलं की गवळी दगडी चाळीत आहे म्हणून पोलिसांनी पूर्ण चाळ शोधून काढली आणि एका खोलीतील सोफ्यामध्ये तडीपार केलेल्या अरुण गवळीला पकडलं गेलं. 


अरुण गवळी आणि त्याची गँग दगडी चाळीच्या बाजूला असलेली झोपडपट्टी आणि खटाऊ मिलचा वापर ही करायचे. खटाऊ माल मध्ये अरुण गवळी आपल्या गुंडांना फायरिंगची ट्रेनिंग ही द्याचा त्यासाठी त्याने खटाऊ मिल सोबत दगडी चाळीत ही फायरिंग रेंज बनवली होती. 


...आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात
2000 या वर्षात गवळी ने राजकारणात एंट्री घेतली. त्याची पार्टी अखिल भारतीय सेना या पक्षाच्या तिकीटवर तो आमदारही झाला. त्याच्या पार्टीचे भायखळा परिसरात तीन नगरसेवक झाले. पण त्यानंतरही त्याने गुन्हेगारी जगतची साथ सोडला नाही. शिवसेना नगरसेवक प्रकाश जामसांडेकर हत्ये प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आलं. 


काळ बदलला.. दाऊद,  छोटा शकील सारखे गँगस्टर देखील बिल्डर झाले आपला धंधा बदलला आणि आता गवळीने देखील बांधकाम व्यवसायत एंट्री घेतली आहे.