मुंबई : परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असतानाच आपल्या महाराष्ट्रातून मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये कामानिमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करत आहोत. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातील श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मुळगावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा, अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.


आमदार आशिष शेलार यांनी पत्रात म्हटलं की, आपण राज्य शासनातर्फे परराज्यातील मजूर व कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याचे नियोजन करत आहात. त्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी करून आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्याकडे वेळीच शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. दिनांक 4 मे रोजी भाभा रुग्णालय येथे मजुरांनी केलेल्या गर्दीने आरोग्याचे नियम पाळण्यात आले नाहीत.


राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे राज्याअतंर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मुळ गावी सोडल्यास त्यांची होणारी गैरसाय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्न पाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.


तसेच परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असताना आपल्या महाराष्ट्रातून मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये कामानिमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करत आहोत. आपल्या विदर्भ, कोकण, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात कामानिमित्त आलेले अनेक चाकारमानी अडून पडले आहेत.यातील बहूसंख्य जण छोट्या छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहत असून त्यांना आरोग्याची काळजी घेणे अवश्यक आहे. याच वर्गाने आजपर्यंत मुंबईतील गिरणीकामगारांपासून अनेक महत्वाच्या उद्योग व्यवसायात व मुंबईच्या आर्थिक विकासात मोठा वाटा निभावला आहे.


त्यामुळे शासनाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था तातडीने करावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचा फैलाव ही रोखता येईल. या भागातील स्थानिक आमदार ही वारंवार सरकारला याबाबत विनंती करीत आहेत. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शसनाने तातडीने याबाबत पावले उचलावीत, ही विनंती आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.


संबंधित बातम्या 




 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका