मुंबई : लॉकडाऊनमुळं परदेशात अडकलेल्या भारतीयांचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशनचा मेगा प्लॉन तयार झाला आहे. जगभरातील 13 देशांत अडलेल्या 14 हजार 800 भारतीयांनी एका आठवड्यात मायदेशात आणलं जाणार आहे. 7 मे पासून हे रेस्क्यू ऑपरेश सुरु आहे.यासाठी एअर इंडिया, खासगी विमान कंपन्या आणि नेव्हीची मदत घेतली जाणार आहे.


या रेस्क्यू ऑपरेशनची सुरुवात UAE पासून होणार आहे. जिथे 2 लाखाहून अधिक लोकांनी भारतात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. भारतातून पहिल्या टप्प्यात फिलिपिन्स, सिंगापूर, बांग्लादेश, यूएई, यूके, सौदी अरेबिया, कतार, अमेरिका, कुवेत, बहारीन, ओमानला फ्लाईट्स जातील. त्या-त्या देशातील दूतावासांमध्ये परराष्ट्र अधिकाऱ्यांनी भारतात परत जाऊ इच्छिणाऱ्यांची यादी करायला सुरुवात केलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन सेवेचा वापर केला जात आहे.


नेव्हीच्या तीन लढाऊ नौका मालदिव आणि यूएईला रवाना होणार आहेत. गल्फ आणि इतर देशांमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी 14 लढाऊ नौकांचा वापर केला जाईल. परदेशातून येऊ इच्छिणाऱ्यांना विमान किंवा समुद्र प्रवासाचा खर्च आणि संस्थात्मक क्वारंटाईनचा खर्च स्वत:ला उचलावा लागणार आहे. गरोदर महिला, वृद्ध लोक, मेडिकल इमर्जन्सी असलेले लोक यांना परत आणण्यासाठी प्राधान्य असणार आहे.


पहिल्या दिवशी 10 फ्लाईट्सच्या मदतीनं 2300 लोकांना भारतात आणलं जाईल. दुसऱ्या दिवशी 2050 लोक चेन्नई, कोच्ची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीसह इतर 9 शहरात पोहोचतील. तिसऱ्या दिवशी 2050 लोक मुंबई, कोच्ची, लखनौ, दिल्लीसह इतर शहरात येतील, हे लोक मध्य आशिया, युरोप आणि अमेरिकेतून येणार आहेत. चौथ्या दिवशी 1850 लोकांना परत आणलं जाईल. ते अमेरिका, इंग्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीसह 8 देशांमधून त्यांची सोडवणूक केली जाईल. परत येण्याआधी या सगळ्यांना आरोग्याची स्थिती सांगणारा फॉर्म भरावा लागेल. ज्याची एक कॉपी अरायव्हल काऊंटरवर इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल. ज्यात प्रवाशाला खोकला, ताप, कफ, मधुमेह किंवा इतर आजार असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल.


लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी  साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. एकूण 64 फ्लाईटपैकी 10 फ्लाईट यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलीपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये धावणार आहेत. या नागरिकांना भारतात पाऊल ठेवल्यानंतर पुढचे 14 दिवस स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली क्वारंन्टाईन राहावं लागणार आहे.


विमानात किंवा जहाजात बसण्याआधी या सर्वांचं स्क्रीनिंग होणार आहे. तसंच ज्यांना कोविडची कुठलीही लक्षणं नाहीत अशाच लोकांना भारतात आणलं जाणार आहे.भारतात आणल्यानंतर पुन्हा त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवलं जाईल. त्याचा खर्च प्रवाशांना द्यावा लागेल. भारतात परत आल्यानंतर या सगळ्या प्रवाशांना आरोग्य सेतू अपवर आपलं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे. 1990 मध्ये झालेल्या गल्फ युद्धानंतरचं हे सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन असणार आहे. त्यावेळी 1 लाख 70 हजार जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. 2015 मध्येही युद्धभूमी झालेल्या येमेनमधूनही ‘ऑपरेशन राहत’ च्या नावानं भारतीयांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं.


संबंधित बातम्या :




Migrants | मजुरांची 1500 किमी सायकल सवारी, तीन मजुरांचा कडाक्याच्या उन्हात वेदनादायी प्रवास | स्पेशल रिपोर्ट