ABP Majha Impact : मराठी शाळा वाचवा मोहीम! मराठी भाषा अध्ययन सक्तीने सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार
महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम 2020 अंतर्गत सक्तीचा असलेला मराठी विषय शिकवत नसलेल्या शाळांवर कारवाई होणार आहे.

Marathi School : गेल्या काही दिवसांपासून एबीपी माझानं 'मराठी शाळा वाचवा' ही मोहीम लावून धरली आहे. आता या मोहीमेची दखल शिक्षण विभागानं घेतली आहे. एबीपी माझाच्या मोहिमेनंतर शिक्षण विभागानं परिपत्रक काढून मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीनं सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम 2020 अंतर्गत सक्तीचा असलेला मराठी विषय शिकवत नसलेल्या शाळांवर कारवाई होणार आहे. एक लाख रुपयांपर्यंत शाळांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शाळांकडून यासंदर्भात खुलासाही मागितला जाणार आहे.
मातृभाषेतील विषय सक्तीनं शिकवला जावा यासाठी मराठी विषय प्रत्येक शाळांच्या प्रत्येक वर्गात शिकवला जावा आणि त्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी शिक्षण विभागाचे परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रत्येक वर्गामध्ये मराठी भाषेचे (विषयाचे) अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम 2020 लागू करण्यात आला होता. 16 मार्च 2020 च्या निर्णयानुसार, प्रत्येक वर्गात मराठी भाषा विषय हा शिकवला जावा, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आला होत्या. मात्र, अशा सूचना देऊनसुद्धा राज्यातील अनेक शाळा मराठी भाषा विषय शिकवत नसल्याचं किंवा या निर्णयाचं अवलंब करत नसल्याचं निदर्शनास येत आहे.
ज्या शाळा मराठी भाषा या निर्णयानुसार सक्तीने शिकवत नाहीत, अशा शाळांना एक लाख रुपयांपर्यंत कारवाई करण्यात यावी शिवाय शाळांकडून खुलासा मागविण्यात यावा, अशा प्रकारचे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहे. सोबतच शाळांबाबत शिक्षणाधिकारी स्तरावर निर्णय घेण्यात यावा असे सूचना देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबत तातडीनं परिपत्रककडून ज्या शाळा मराठी भाषा विषय शिकवत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून ज्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जात नाही, त्या शाळांमध्येसुद्धा प्राथमिकसाठी इयत्ता पहिली या वर्गाला तर माध्यमिक शाळांसाठी इयत्ता सहावी या वर्गाला मराठी भाषा विषय सुरु करून चढत्या क्रमाने प्रत्येक वर्षी पुढच्या वर्गाला तो विषय सुरू राहील, अशा प्रकारे नियोजन करून हा विषय शिकवला जावा, असं यामध्ये सांगण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Marathi School : हिंदी, उर्दू, इंग्रजी शाळांच्या संख्येत वाढ, मराठी शाळा वाचवा, 'माझा'ची मोहीम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
