मुंबई : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल 90.66 टक्के लागला. या निकालातील जिद्दीच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या. अशीच जिद्दीची कहाणी आहे मुंबईतील दहिसरमधल्या एका महिलेची. वयाच्या पन्नाशीत या महिलेने वाणिज्य शाखेतून बारावीची दिली आणि उत्तीर्णही झाली. दिव्या विनोद कोटडिया असं या महिलेचं नाव आहे. "अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है," हे दिव्या विनोद कोटडिया यांच्याबाबतची तंतोतंत लागू झालं आहे.


दहिसर पूर्वमधील आनंद नगर परिसरातील गिरिराजनगरमध्ये राहणाऱ्या दिव्या विनोद कोटडिया यांचं वय 50 वर्ष आहे. त्यांनी 2019-20 या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा दिली होती. एवढंच नाही तर त्या परीक्षेत त्यांनी यशही संपादन केलं. दिव्या कोटडिया यांनी 36 वर्षांपूर्वी विले पार्ले पश्चिम इथल्या एम एम गर्ल्स हायस्कूलमध्ये 1984-85 या वर्षी दहावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर लग्न आणि संसारात त्यांचे शिक्षण बाजूला पडलं. संसाराच्या व्यापात शिक्षणाची आस असूनही त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. नवरा, सासू सासरे आणि दोन मुल यांच्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. आज त्यांची दोन मुलं तरुण आहेत. कल्पेश 30 वर्षाचा असून चिराग 28 वर्षाचा आहे. या दोघांनाही आपल्या आईने मिळवलेल्या यशाचा अभिमान वाटतोय.



या विषयावर दिव्या सांगतात की, "एकदा माझ्या धाकट्या मुलाने मला माझी काही इच्छा आहे का? याबद्दल प्रश्न विचारला. त्याच्याकडे मी शिक्षण पूर्ण करण्याविषयी असलेली आस बोलून दाखवली. त्यानंतर त्यानेच पुढाकार घेऊन मला इंग्लिश शिकण्याचा क्लास लावला. पुढे क्लासमध्ये माझं अॅडमिशनही करुन दिलं. आज मी बारावी पास म्हणून समाजात मान मिळवू शकते. त्याचं मला समाधान आहे.

बारावी पास झाल्यानंतर पुढे देखील शिकण्याची इच्छा दिव्या बोलून दाखवतात. तसंच शिकण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. फक्त प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे आणि मेहनतीची तयारी आवश्यक आहे. याच आधारावर तुम्ही तुमचं कोणतंही स्वप्न पूर्ण करु शकता, असंही त्या इतर महिलांना सांगतात.



दिव्या कोटडिया यांचा मुलगा चिरागने सांगितलं की, आईची इच्छा पूर्ण केल्याचा मला आनंद आहे, मी एक लेक्चरर आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व मी जाणतो. त्यामुळेच पुढाकार घेऊन मी आईचा फॉर्म भरला आणि अभ्यासातही तिला मदत केली. आज आई पास झाल्यामुळे आम्ही सगळेच फार आनंदी आहोत. आईचे उदाहरण घेऊन समाजातील इतर बायकाही आपलं शिक्षण पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra HSC Results | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, मागील वर्षीच्या तुलनेत प्रगती

Maharashtra HSC Results | निकालात मुलींची पुन्हा सरशी, बारावीच्या निकालासंदर्भात आठ महत्वाच्या गोष्टी

Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा रिझल्ट

HSC Results | बारावीच्या निकालात कोकणची बाजी तर नागपूरच्या चैतन्य अय्यरचे घवघवीत यश