Maratha Reservation : मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता; मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जोरदार हालचाली केल्या जात असल्याचे समोर आलं आहे. काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठकांचे सत्र बघायला मिळाले आहे.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जोरदार हालचाली केल्या जात असल्याचे समोर आलं आहे. काल (31 ऑगस्ट) रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठकांचे सत्र बघायला मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी 11 वाजता वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे साताऱ्याहून तर अजित पवार पुण्यातून मुंबईच्या दिशेनं रवाना
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल (31 ऑगस्ट) पुण्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी आले होते. मात्र, ते देखील तातडीने मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होतील. यामध्ये नेमका काय तोडगा निघणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री-महाधिवक्ता यांच्यातील चर्चेनंतर मनोज जरांगेंना प्रस्ताव जाण्याची शक्यता
पुढे आलेल्या माहितीनुसार, मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर असल्याने आता सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil)सरकारकडून प्रस्ताव जाण्याचीही शक्यता अधिक असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काल रात्री उशिरा वर्षावर बैठक संपन्न झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. अशातच आता मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.
मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आज वर्किंग-डे असल्यामुळे प्रत्येक नोकरदार मुंबईकर हा आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचत आहे मात्र ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने प्रत्येक नोकरदार मुंबईकराची तपासणी करून आणि त्यांच्या बॅगमध्ये असलेले साहित्य तपासूनच त्यांना आत मध्ये प्रवेश दिला जातो आहे. आय कार्ड नसलेल्यांना पोलिसांकडून प्रवेश नाकारण्यात येतोय.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
महत्वाच्या बातम्या:

























