मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायच्या या संदर्भातला अभ्यास गटाचा अहवाल तीन मार्चला सादर होणारं आहे. बदल्या कशा प्रकारे केल्या जाव्यात या संदर्भात पाच सीईओंचा एक अभ्यासगट अभ्यास करुन अहवाल तयार करत आहे. आता हा बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल याची शिक्षकांना उत्सुकता आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांवरून राज्यभर वादळ उठले आहे. या बदल्या ऑफलाईन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्री आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडी प्रमाणे जनभावना लक्षात न घेता हा निर्णय देखील बदलला जाण्याची शक्यता आहे.


ऑनलाईनच्या अभ्यासासाठी शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला आहे. मंगळवारी 25, फेब्रुवारीला राज्यातील शेवटची विभागनिहाय बैठक नागपूर आयुक्तालयात पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांची 99 टक्के मतं ही बदल्या ऑनलाईनच प्रक्रियेने व्हाव्या, या बाजूने व्यक्त झाली.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द होण्याची शक्यता, जिल्हा परिषदेकडे पुन्हा अधिकार देण्याच्या हालचाली

अभ्यास गटासमोर आलेले चर्चेचे मुद्दे

ऑनलाईन बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावर असावेत का?

पती पत्नी एकत्रिकरणाचे अंतर हे तीस किमीवरून पन्नास कमी करावे का?

अवघड क्षेत्र पुनर्निर्मित करण्यात यावेत

बोगस प्रमाणपत्र सादर करून शिक्षकांच्या होणार्या बदलीसाठी कारवाईचा पॅटर्न असावा.

राज्यातल्या शिक्षक संघटनांची 99 टक्के मत ऑनलाईन बदल्या कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत .

बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे. संघटनांची बदल्या ऑनलाईनच व्हायला हव्यात अशी मागणी आहे. भाजप सरकारच्या काळातल्या निर्णयामुळे लाचखोरी थांबली होती. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशा मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सरकारला दिले आहे.

शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे

राज्य शासनाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे नवे धोरण ठरविण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास विभागाने या संदर्भाचा अभ्यास गट नेमला आहे. त्यात पुणे, रायगड, चंद्रपूर, नंदूरबार आणि उस्मानाबादचे सीईओ सदस्य आहेत. हा अभ्यासगट तीन मार्चला सरकारला आपला अहवाल सादर करेल.


रोहित पवारांचे यांचे ऑफलाईन बदल्यांना समर्थन ?
रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या 10- 15 वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करता असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामना करावा लागतो. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, तर दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही देखील होत आहेत असे रोहित पवार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

पंकजा मुंडे यांनी घेतला होता निर्णय
राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, असं म्हणत तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेताना सांगितलं होतं.