ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
Supriya Sule Letter to Devendra Fadnavis: सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Supriya Sule Letter to Devendra Fadnavis: तुळजापूर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक
सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे. अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्यांना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक कृत्यांना थारा देणे होय,” असा थेट शब्दांत सुळे यांनी फडणवीस यांना पत्रातून इशारा दिला आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, “लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पक्षाला संघटन वाढविण्याचा अधिकार आहे, मात्र समाजविघातक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय आसरा देणे ही अत्यंत गैर जबाबदारीची बाब आहे. आपण राज्याचे प्रमुख म्हणून या घटनेकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे.” सुळे यांनी ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी देण्याचं महत्त्व अधोरेखित करत सांगितलं की, “महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय दिला जाणार नाही, असा ठोस संदेश सरकारकडून जावा,” ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे.
प्रति
— Supriya Sule (@supriya_sule) November 12, 2025
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई
विषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..
मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,
तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये…
काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी?
तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल.
आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























