जळगाव : कोविड रुग्णालयाच्या बाथरुममध्ये महिलेच्या मृत्यूनंतर कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापणातील गलथान पणाला जबाबदार धरत शासकीय वैदयकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या सह तीन जणांना निलंबित केलं गेलं आहे. मात्र डीन भास्कर खैरे यांच्या गलथानपणा बद्दल जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी शासनास अहवाल पाठवून त्यांच्या जागी नियमित अधिष्ठाता नियुक्त करण्याची मागणी एक महिन्याच्या पूर्वीच केल्याचं समोर आहे. त्याचवेळी जर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचा आणि मागणीचा विचार केला गेला असता तर कोरोनाबधितांचे मृत्यू टाळता आले असते का? अशी चर्चा होताना आता दिसत आहे


जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधितांची संख्या आणि उपचाराच्या दरम्यान झालेले मृत्यू याचा विचार केला तर कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार त्याला कारणीभूत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीच्या आधारे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या व्यवस्थापनातील हलगर्जीपणा आणि भोंगळ कारभार सुधारण्यासंदर्भात त्यांना वेळो वेळी सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनांचे पालन न करता राज्य शासनाच्या निर्देशचा भंग केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांशी 1 मे रोजी पत्रव्यवहार केला आहे. या सोबतच तीन मे रोजी ही शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या सचिवांशी ही त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय कोरोनाच्या वाढत्या मृत्यू संख्येबाबत उपचारामध्ये सुसूत्रता यावी यासाठी नियमित अधिष्ठाता आवश्यक असल्याच ही वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभागाला पत्रव्यवहार करून सूचित केल्याच 'माझा'च्या हाती लागलेल्या पत्र व्यवहारावरून समोर आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांचा या मागणीचा विचार करता कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्या जळगाव येथे बदलीचे आदेश ही काढण्यात आले होते. मात्र त्या जळगाव येथे येण्यापूर्वीच ते रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा डॉ. भास्कर खैरे यांच्याकडे पदभार देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. एकीकडे रुग्णांची वाढत जाणारी संख्या आणि वाढता मृत्यू दर पाहता नियमित अधिष्ठाता यांची आवश्यकता असताना नियमित डीन नियुक्ती आदेश निघाल्यानंतर ही त्यांची नियुक्ती का होऊ शकली नाही. डॉ. भास्कर खैरे यांच्या गलथानपणाचा अहवाल स्वतः जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी शासनास कळविला असतानाही खैरे यांच्या कडे कोविड रुग्णालयांची धुरा का सोपविण्यात आली. त्या वेळीच त्यांना बाजूला करुन नियमित अधिष्ठाता यांची नियुक्ती करण्यात आली असती. तर कदाचित खैरे यांनाही निलंबित करण्याची गरज पडली नसती. शिवाय योग्य व्यवस्थान आणि उपचार मिळून अनेक रुग्णांचे प्राण वाचले असते का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.


संबंधित बातम्या :