कोल्हापूर: झाडांना खिळे मारु नका असं पर्यावरण प्रेमींकडून वारंवार सांगण्यात येत असूनही काही लोकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. आजूबाजूच्या अनेक झाडांना खिळे मारल्याचं दिसून येतंय. कोल्हापूर शहरातही अनेक झाडांना खिळे मारुन त्यावर जाहिराती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे झाडांना नुकसान पोहचतंय हे लोकांना समजत नाही.


आता मात्र कोल्हापूरात या प्रश्नावर जनजागृती होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि जवळपास 50 सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून 'खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर' ही मोहीम सुरु करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक कोल्हापूरकरांनी सहभाग घ्यावा असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.


नवीन वर्षात मोहिमेचा शुभारंभ
झाडांवर जाहिरातीसाठी वा इतर काही कारणांसाठी खिळे मारण्यात येतात. पर्यावरणाचं संवर्धन करताना असा प्रकार रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. या मोहिमेमुळं येत्या काही दिवसात कोल्हापूर शहर हे खिळेमुक्त झाडांचे शहर बनलेलं असेल असा विश्वास पालक मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. नवीन वर्षातल्या पहिल्या रविवारी म्हणजे 3 तारखेला या मोहिमेचा शुभारंभ होणार असून शहरातील झाडांवरल मारण्यात आलेले लाखो खिळे काढले जाणार आहेत.


सामाजिक संस्था आणि महापालिकेची मदत
नवीन वर्षात सुरू होणाऱ्या या मोहिमेमध्ये अनेक सामाजिक संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिका देखील सहभागी होणार आहे. छोट्या झाडांवर मारलेले खिळे सहज काढता येतील, मात्र मोठ्या झाडांवर मारलेले खिळे हे पालिकेच्या मदतीतून काढले जाणार आहेत.


तरुणांनी मोबाईलवर डीपी ठेवावा- सतेज पाटील
एखाद्या मोहिमेची सुरुवात करत असताना त्याचा प्रसार होणं देखील तितकंच महत्त्वाचं असते. आत्ताच्या परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेचा प्रचार करणं गरजेचा आहे. त्यामुळेच तरुणांनी आपल्या मोबाईलचा डीपी 'खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर' हा ठेवावा असं आवाहन देखील सतेज पाटील यांनी केलं.


संबंधित बातम्या: