इकडं संजय राऊत म्हणाले, तर मी भाजपचे देशात 15 तुकडे करून दाखवेन; तिकडं सतेज पाटील म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकणारा केडर किती असेल?
Sanjay Raut and Satej Patil: भाजप केवळ ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर चालत आहे. शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत शिंदेंकडे धनुष्यबाण नसेल.

Sanjay Raut and Satej Patil on BJP: भाजप ही प्रवृत्ती आहे आणि शिंदे विकृती आहे, आम्ही प्रवृत्तीसोबत (भाजप) आम्ही 25 वर्षे काढली आहेत आणि त्यांच्याशी लढता येते, पण विकृतीला पूर्णपणे खतम करायचं असतं, विकृतीची कीड चिरडायची असते, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा अशी विकृती लागू नये, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. माझा कट्टावर बोलताना राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
भारतीय जनता पक्षाचे 15 तुकडे करून दाखवेन
भाजपवर हल्ला चढवताना राऊत म्हणाले की, माझ्या हातामध्ये जर या राज्याची किंवा देशातल्या काही विशिष्ट खात्याची सत्ता आली, तर या भारतीय जनता पक्षाचे मी 15 तुकडे करून दाखवेन. त्यांनी पुढे चॅलेंज दिले की, देशभरात भाजपचे 15 तुकडे करेन आणि हे तुकडे कुठे गेले, कुठे पडले हे त्यांना कळणार सुद्धा नाही. भाजप सध्या केवळ ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर चालत आहे. शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत शिंदेंकडे धनुष्यबाण नसेल. भारतीय संविधानानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल आणि अमित शाह यांनी शिंदेंना जी कंपनी चालवायला दिली आहे, तिचे शटर डाऊन होईल. त्यांनी असेही भाकीत केले की, शेवटी शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल आणि त्यांचे लोक त्यांच्यासोबत राहणार नाहीत. शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, ज्यांच्यासमोर तुमची केस सुरू आहे त्यांच्यासमोर अशा प्रकारे वाकणे हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसे नाही.
मराठी माणूस आजही ठाकरेंच्या मागे उभा
राऊत यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित 71 जागा निवडून येणे हा संघर्षातून मिळालेला आनंद आहे. त्यांनी दावा केला की, मराठी माणूस आजही ठाकरेंच्या मागे उभा आहे, तर भाजपला केवळ परप्रांतीय बहुसंख्या असलेल्या भागात मते मिळाली आहेत. राऊत यांनी असाही इशारा दिला की, मुंबईसाठी लढणारी ही आमची शेवटची पिढी आहे. कारण केंद्रातील सत्ताधारी मुंबईचे महत्त्व कमी करून तिला दुबळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपचा केडर हा सत्तेत असल्यामुळे ऐकतो का?
दरम्यान, काॅफी विथ कौशिकमध्ये बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांवर (केडर) असलेल्या त्यांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणतात, फडणवीस नेतृत्व म्हणून भाजपचं नेतृत्व ते राज्यभर करतात परंतु त्यांचं ऐकण्याची क्षमता असणारा भाजपचा केडर हा सत्तेत असल्यामुळे ऐकतो का हा माझ्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. ते म्हणाले की, भाजपमध्ये सेंट्रलाईज पॉलिटिक्स आहे ते सत्तेचं पॉलिटिक्स आहे. नेतृत्वाचं पॉलिटिक्स आहे असं मी मानत नाही. ज्यावेळी भाजप सत्तेत नसेल तेव्हा पुढील काळामध्ये त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं ऐकणारा महाराष्ट्रातला भाजपचा केडर किती आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल.
इतर महत्वाच्या बातम्या
























