देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आक्रमक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात कशी बरबाद होत आहे, याचे अत्यंत भीषण वास्तव मांडले आहे.

Raju Shetti on Devendra Fadnavis: "महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा आणि संतांच्या संस्कारांचा आहे. इतका थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही 'बदनामी' शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण वास्तवाबद्दल असते. विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी, माध्यमांनी दाखवले की ती बदनामी... मग जनतेने काय मरायचे का? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते?" असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
'घराघरांच्या उंबरठ्यापर्यंत ड्रग्ज'
राजू शेट्टी यांनी आपल्या पत्रात थेट गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात, "ड्रग्ज विकणारे पेडलर्स आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या माशांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. मुंबईचे किनारे असोत, पुण्याचे पब-कट्टा संस्कृती असो, नाशिक-संभाजीनगर सारखी शहरे असोत, शाळा-कॉलेज असोत की ग्रामीण भाग ड्रग्जचे जाळे आता प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. तुम्ही मंत्रालयात बसून बदनामीची भाषा करत आहात, पण इथल्या झोपडपट्ट्यांपासून ते हाय-फाय सोसायट्यांपर्यंत, एका बापाची कमाई आणि आईचे कुंकू ड्रग्जच्या विळख्यात रोज जळून खाक होत आहे."
म्हातारपणाची काठी व्हायचे सोडून पोरं आई-बापाचा गळा आवळतायत!
राज्यातील अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील तरुण मुले या ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे सांगताना शेट्टी यांचेtop दुःख आणि संताप अनावर झाला. "आपली मुले डोळ्यांदेखत बरबाद होताना पाहून हतबल झालेले आई-बाप रात्री रडत आहेत. ही बदनामी नाही, हा त्या कुटुंबांचा आक्रोश आहे. ज्या हातांनी म्हातारपणी काठी व्हायचे, ते हात आज ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत. हे पाप कोणाचे?" असा थेट आणि अंगावर येणारा सवाल त्यांनी व्यवस्थेला विचारला आहे.
7 वी, 8 वीच्या निष्पाप पोरांच्या हातात अंमली पदार्थ
राजू शेट्टी यांनी स्वतः प्रत्यक्ष ग्राउंडवर पाहिलेले भीषण वास्तव मांडताना सांगितले की, "१४ ते २२ वयोगटातील पोरांनी हत्या केलेल्या मयतांच्या वारसांशी आणि आरोपी असलेल्या पोरांच्या आईबापाशी मी स्वतः बोललो आहे. त्यांच्याकडून वस्तुस्थिती ऐकल्यानंतर मी हादरून गेलो. दुनियादारी माहीत नसणाऱ्या ७ वी, ८ वीच्या खेड्यातील निरागस पोरांच्या हातात जेव्हा मी अमली पदार्थ पाहिले, तेव्हा ही व्यवस्था किती सडलेली आहे हे सत्य मला समजले. म्हणूनच जेव्हा नागरिक, माध्यमं किंवा विरोधक यावर बोलतात, तेव्हा तो केवळ राजकीय आरोप नसतो, ती आपल्या घरातील मुलाबाळांच्या सुरक्षेची चिंता असते."
ही 'बदनामीची' नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई
पत्राच्या शेवटी शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक सक्षम गृहमंत्री आणि राज्याचे नेते म्हणून राजकारण बाजूला ठेवून काम करण्याचा सल्ला दिला आहे. "महाराष्ट्र कधीच बदनाम होणार नाही, कारण या मातीची ताकद मोठी आहे. पण या मातीतील तरुण जर अंमली पदार्थांच्या नशेत संपून गेला, तर हा प्रगतीशील महाराष्ट्र पुढे कोण नेणार? गृहमंत्री म्हणून आपण ही बदनामीची लढाई म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तरुण पिढीला वाचवण्याची लढाई म्हणून पाहावी. सत्य स्वीकारून यावर निर्णायक प्रहार करावा," अशी आर्त हाक राजू शेट्टी यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या






















