मुंबई : वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी तयार करण्याच्या ममता बँनर्जींच्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर दिलं. 


यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "वेगवेगळ्या मार्गांचा वापर करुन भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरोधात कांग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामान्यांच्या प्रश्नावर लढा दिला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी लढणं आवश्यक आहे. भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे."


काँग्रेसला कोणत्याही प्रशस्तीपत्रकाची गरज नाही
ममता बँनर्जींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला.


काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी? 
भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, "काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार?"


संबंधित बातम्या :