मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत पोहोचल्या असून त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी 'जय मराठा, जय बांगला'चा नारा दिला. त्यांच्या या नाऱ्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपविरोधी पक्ष एकत्र येतात का, त्यामध्ये ममतांचा पक्ष राज्यातील निवडणुका लढवणार का याची उत्सुकता आहे. 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज संध्याकाळच्या दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार आहेत. तर उद्या ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. 


पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाची धुळ चारल्यानंतर आता ममता बँनर्जींचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचा देशभर विस्तार करण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी देशभरातील विविध भागांना भेटी द्यायला सुरु केलं आहे. आता ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर असून त्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटणार आहेत. 


मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींसोबतही भेटी घेणार आहे. पश्चिम बंगालमध्ये व्यावसाय वाढीसाठी ही भेट असल्याचे बोललं जात आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर  दिली जाणार जाईल. गोवा,  मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतलाय. 


संबंधित बातम्या :