नागपूरच्या MIDC मध्ये पाण्याची टाकी कोसळून सहा मजुरांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत : मुख्यमंत्री
नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये अवाडा कंपनीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे.
Nagpur : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये अवाडा कंपनीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता तर 11 मजूर गंभीर जखमी होते. उपचारा दरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दुख: व्यक्त केलं आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय, मृतांच्या वारसांना 30 लाख रुपये संबंधित कंपनी देणार आहे. तर जखमींना 10 लाख आणि उपचारांचा खर्च देण्याचेही कंपनीने मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
अतिशय दुर्दैवी घटना, मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली : मुख्यमंत्री
नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीत एका कंपनीत झालेल्या दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 9 कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
नागपूर जिल्हाधिकारी यांच्याशी मी संपर्कात आहे आणि तेही संबंधित यंत्रणाशी समन्वय ठेवून आहेत. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. याशिवाय, मृतांच्या वारसांना 30 लाख रुपये संबंधित कंपनी देणार असून, जखमींना 10 लाख आणि उपचारांचा खर्च देण्याचेही कंपनीने मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
























