Nashik Monsoon Crop : शेतकऱ्यांनो, इकडं लक्ष द्या! पेरणीसंदर्भात नाशिक कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे.
Monsoon News : अखेर मान्सून (Monsoon) मुंबईच्या (Mumbai) वेशीवर दाखल झाला आहे. पुढील 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे. राज्याची उपराजधानी नागपुरातही (Nagpur) मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Pune Rain : पुरंदरमध्ये आज पावसाचं आगमन झालंय. आज सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सकाळी दहा वाजता सासवड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर तालुक्याच्या इतर भागातही पावसाळा सुरुवात झाली. साडेअकरानंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळं आता बळीराजा सुखावणारं आहे .संपूर्ण महिना शेतकरी पावसाची वाट पाहत होता. मात्र, शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची कामे करण्यासाठीची लगबग सुरु होणार आहे.. बारामती शहरात देखील पावसाने हजेरी लावली.
Ratnagiri rain : चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
Thane Rain : मुंबईप्रमाणं ठाण्यासह, कळवा आणि मुंब्रासारख्या उपशहरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाणे, कळवा मुंब्रा येथे सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं परिसरातील वातावरण थंड झाले आहे. काल सकाळी पावसाच्या काही सरी बरसल्यानंतर दिवसभर पावसाने उसंती घेतली होती. त्यानंतर आज सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. या दरम्यान सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरले होते. एक ते दीड तास संततधार पाऊस पडल्यानंतर पाऊसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे.
अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने नारिकांची मोठी तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तीव्र उन्हाच्या झळा बसत असून त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात काही महिन्यापासून सूर्य आग ओकतोय. उन्हाचा पारा वाढतच गेला त्यामुळे नागरिक कालपर्यंत हैराण झाले होते. मात्र आज सकाळी अचानक बुलढाणा शहरातील काही भागात धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह दिसून आलाय. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला असून अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांसह नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत..आज सकाळी मात्र बुलढाणा शहरा नजिक असलेल्या राजूर घाटात धुक्याची चादर दिसून आली असून ढगाळ वातावरण बनले असून हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे..
Mumbai Rain : पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले, वांद्रे परिसरात जोरदार पाऊस सुरु झालाआहे.
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -