Vidharbha Flood : गेले दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेलं पावसाचं थैमान आजही कायम  आहे.  विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसलाय. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे.  आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर इतर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे अमरावतीच्या 30 तर तर वर्ध्याच्या 42 गावांचा संपर्क तुटला. मदत आणि बचावकार्यासाठी वर्ध्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्यात. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त भागांची ते पाहणी करणार असून त्यानंतर नागपुरात या संपूर्ण स्थितीची आढावा बैठक होणार आहे.


अकोल्यात शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी, पिकांचंही मोठं नुकसान (Akola Flood) 


अकोल्यातही पूरस्थिती कायम आहे. पूर्णा नदीला पूर आल्याने गांधीग्राम पुलावर 10 ते 12 फूट पाणी आलंय. या पुलावरुन पाणी जात असल्याने अकोट-अकोला मार्ग 18 तासांपासून बंद आहे. अकोट-शेगाव-अंदुरा मार्गही बंद झालाय.  अकोला शहरातील शेकडो घरांमध्येही पाणी शिरलंय. अनेक भागातील शेतीही पाण्याखाली गेलीय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. पूर्णा मध्यम प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आलेत. पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोल्यातील एकूण सहा तालुके बाधित झाले आहे.



  • अकोल्यातील बाधित तालुके -  अकोट, अकोला, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातुर

  • किती लोकांना पुराचा फटका बसला - 200 च्या वर

  • किती अंदाजे शेतीला फटका आहे - 30 हजार हेक्टर प्राथमिक अंदाज

  • किती गावे बाधित आहेत - रतनपुरी-झुरळ खुर्द

  • मृत्यू - दोन दिवसांपूर्वी गांधीग्रामच्या पूर्णा नदीत युवकाचा वाहून गेल्याने मृत्यू


वर्ध्यातही पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत (Wardha Flood)


वर्ध्यातही पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तीन दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोढे कुटुंबातील  चार जणांची सुटका करण्यात आली. हिंगणघाट तालुक्यातील सावंगी हेटी गावातील शेतशिवरात पुराचं पाणी घुसलं. कुटुंबानं वणा नदीचे पाणी वाढल्याने एका झोपडीचा आधार घेतला होता. एनडीआरच्या जवानांनी बोटींच्या मदतीने तब्बल 11 किलोमीटरचा प्रवास करून केली या लोकांची सुटका केली.



  • वर्धा जिल्ह्यात आठ पैकी  सहा तालुके बाधित -  वर्धा, आर्वी, सेलू ,देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर 

  • किती लोकांना पुराचा फटका - पूर परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण 61 गावे बाधित झाली आहे.  बाधित कुटुंबाची संख्या 1 हजार 303 इतकी आहे.

  • किती अंदाजे शेतीला फटका आहे - 835 गावात शेतीचे नुकसान झाले आहे.

  •  बाधित शेती क्षेत्र -  63 हजार 325 हेक्टर 

  • किती गावे बाधित आहेत - जिल्ह्यातील एकूण 61 गावे बाधित झाली आहे. 

  • किती लोकांना स्थलांतरित केले आहे - हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.  त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे


यवतमाळला पावसाचा फटका (Yavatmal  Rain Update)


यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, बाभूळगाव तालुक्याला पाऊस आणि पुराचा फटका बसलाय. राळेगाव तालुक्यात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेताला तलावाचं स्वरुप प्राप्त झालंय. चहांद गावातील शेतकऱ्याचं तीन एकर शेत पाण्याखाली गेलंय. शेताची अवस्था ही पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय



  • यवतमाळ जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, यवतमाळ, उमरखेड 

  • या सात तालुक्यातील जवळपास दोन हजारावर नागरिकांना पुराचा नागरिकांना पुराचा फटका बसला

  • मागील 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा आणि  पैनगंगा नदी नाल्या काठावरील जवळपास 70 ते 75 हजार हेक्टरवर  शेतीचे नुकसान झाले

  •  सात तालुक्यातील 12 गावांना पावसाचा फटका बसला

  • 800 ते 900 नागरिकांना  गावातील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.


चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यातील पळसगावची स्थिती बिकट (Chandrapur Flood) 


चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यातील पळसगावची स्थिती बिकट झालीय. वर्धा आणि शिरणा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. 1994 नंतर पहिल्यांदाच पळसगाव ग्रामस्थांनी मोठा महापूर अनुभवलाय. संपूर्ण गावात चार ते पाच फूट पाणी घुसल्याने हे गाव रिकामे करण्यासाठी प्रशासना प्रयत्न करत आहेत. नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहचवलं जात आहे.



  • किती तालुके बाधित -  जिल्हातील एकूण चार तालुके सर्वाधिक बाधित झाले आहे  सिरोंचा, अहेरी, भामरागड, मूलचेरा तालुक्यांचा समावेश आहे

  • किती गावांना पुराचा फाटका -  45 गावांना पुराचा फटका बसला आहे

  • किती गावे स्थलांतरित करण्यात आले - जिल्ह्यातील 45 गावांचे स्थलांतर करण्यात आले

  • किती कुटुंबांना हलवले - जिल्ह्यातील 2785 कुटुंबांना हलवले 

  • किती लोकांना सुरक्षित स्थळी हलवले - जिल्हातील एकूण 11836  लोकांना सुरक्षीत स्थळी हलवले 

  •  सर्वाधिक गावांना स्थलांतर -  सिरोंचा तालुक्यातील 34 गावांचे स्थलांतर यामध्ये सिरोंचा तालुक्यातील 2424 कुटुंबाना हलवले. लोकसंख्या 10563 सुरक्षीत स्थळी हलवले 

  • पुरामुळे शेतीचे नुकसान - अंदाजित आठ हजार हेक्टरहून अधिकच नुकसान झाले आहे तर कापसी च 90 टक्के नुकसान झाले आहे 


अमरावतीमध्येही पुराचा फटका (Amravati Rain Update) 


अमरावतीमध्येही पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसामुळे भातकुली तालुक्यातील पेढी नदी आणि मेळघाटातील सिपणा नदीला पूर आलाय. पेढी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसलाय. पेढी नदीला लागून असलेल्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 25 ते 30 वृद्धाचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. 



  • किती तालुके बाधित आहेत - 90 सर्कलमधून 31 सर्कलला 65 mm च्या वर  पाऊस 

  • कुठले तालुके बाधित - सात तालुके 

  • किती लोकांना पुराचा फटका -  30 गावांना फटका 

  • किती अंदाजे शेतीला फटका आहे - कालच्या पावसामुळे 15 ते 20 हजार हेक्टरवरील पिकांना फटका 

  • किती गावे बाधित आहेत - 35 गावे बाधित 

  • किती लोकांना स्थलांतरित केले आहे - 80 कुटुंब

  • मृत्यू - आज चांदूरबाजार तालुक्यात आईसह मुलीचा मृत्य


बुलढाण्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुराचा फटका


बुलढाण्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलाय. पुराचे पाणी नदीकाठच्या शेकडो एकर शेतीत शिरलंय. त्यामुळे सोयाबीन, कापसाची शेती पाण्याखाली गेली आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यातील धरणातून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या :



दोन्ही बाजूंनी नदीचा प्रवाह, चार तास मृत्यूच्या विळख्यात; जळगावच्या सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका