![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashtra Political Crisis : 'मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन' म्हणणारे गुलाबराव पाटीलही गुवाहाटीकडे रवाना?
Maharashtra Political Crisis : काही दिवसांपूर्वी बोलताना 'मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन' असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. पण सध्या तेच नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे तेही शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
![Maharashtra Political Crisis : 'मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन' म्हणणारे गुलाबराव पाटीलही गुवाहाटीकडे रवाना? Maharashtra Political Crisis shivsena leader gulabrao patil disappear May Leaving for Guwahati Marathi News Maharashtra Political Crisis : 'मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन' म्हणणारे गुलाबराव पाटीलही गुवाहाटीकडे रवाना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/25/28564b74caa150dd2eae49c19409f88e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास दोन तृतियांश आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. अशातच आता शिवसेनेतीव महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदे असलेल्या आसाममधील गुवाहाटी हॉटेलच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिंदेंच्या गटात आता शिवसेनेच्या 46 आमदार असल्याचा दावा केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच 'मी डब्बा अन उद्धव ठाकरे माझे इंजिन उद्धव ठाकरे, जिकडे सांगतील तिकडे मी जाईन', असं काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील म्हणाले होते. अशातच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती एबीपी माझाला शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे आमदार आणि मंत्री एकापाठोपाठ एक एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. अशातच संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी केलेल्या एका ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. अशातच, आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काहीव आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)