Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई रस्ता (Nashik-Mumbai Highway) वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात, ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे. नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर (Traffic) तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले.


आमदार रईस शेख यांनी नाशिक-मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. तरी मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे (Thane) या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरुन प्रवास करतो. जळगाव (Jalgaon), धुळे, अहमदनगर (Ahmednagar) आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरुन मुंबईमध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दादा भुसे, अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरुन प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? अशा प्रश्न उपस्थित केला. 


अनेक मंत्र्यांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता, असा  चिमटा थोरात यांनी मंत्री भुजबळ आणि भुसे यांना काढला. थोरात पुढे म्हणाले, एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. या प्रवासात काही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्रिमहोदय उत्तरात सांगतात की ऑगस्ट 2024 पर्यंतही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिल. मंत्री महोदय असे चालणार नाही, हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील, असे आवाहन थोरात यांनी केले. 


वाहतूक कोंडीचा आढावा


यावर मंत्री दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे. तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील, त्या उपाययोजना करुन आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल, असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री भुसेंना सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरु आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करुन दिली पाहिजे, त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.


हेही वाचा


विधीमंडळात गाजला खड्ड्यांचा मुद्दा, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक