Maharashtra News Updates 14 November 2022 : ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Nov 2022 11:21 PM
ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आला आहे. ठाकरे गटाकडून ठाण्यात मेळावा घेण्यात आलाय. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील घटनास्थळी उपस्थित होते.  

कोल्हापूर : वाजतगाजत कचरा आणला आणि ग्रामपंचायत कार्यालयात टाकला! 

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला लागून असलेल्या कबनूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाजतगाजत कचरा आणून थेट ग्रामपंचायत कार्यालयात टाकला. कबनूरमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून घंटागाडी, कचरा उठाव बंद आहे. त्यामुळे मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा आणून टाकण्याचा प्रकार सुरु आहे. 

Solapur News : पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर

पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत. जवळपास अडीच ते तीन हजार मतांनी सर्वच उमेदवार आघाडीवरती आहेत. 

पुळूज व्यक्ती उत्पादक गट


विश्वराज महाडिक-  5826(महाडिक पॅनल)
देवानंद गुंड - 2177 (राजन पाटील पॅनल)
(आघाडी - 3649)


पुळूज व्यक्ती उत्पादक गट


बिभीषण वाघ- 5621(महाडिक पॅनल)
कल्याणराव पाटील - 2229(राजन पाटील पॅनल)
(आघाडी -3392)


टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट


संभाजी कोकाटे - 5810(महाडिक पॅनल)
शिवाजी भोसले - 2950(राजन पाटील पॅनल)
(आघाडी 2860)


टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट


सुनील चव्हाण - 5822(महाडिक पॅनल)
राजाराम माने - 2153(राजन पाटील पॅनल)
(आघाडी - 3669)


सुस्ते व्यक्ती उत्पदक गट


तात्यासाहेब नागटिळक - 5795(महाडिक पॅनल)
पंकज नायकुडे - 2199(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3596


सुस्ते व्यक्ती उत्पदक गट


संतोष सावंत - 5537(महाडिक पॅनल)
विठ्ठल रणदिवे - 2133(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3404


अंकोली व्यक्ती उत्पदक गट


सतीश जगताप - 5703(महाडिक पॅनल)
भारत पवार - 2176(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3527


गणपत पूदे - 5557(महाडिक पॅनल)
रघुनाथ सुरवसे - 2052(राजन पाटील पॅनल)
आघाडी,- 3505


कोन्हेरी गट


राजेंद्र टेकळे - 5666(महाडिक पॅनल)
कुमार गोडसे -2416(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3350


अनुसूचित जाती जमाती


बाळासाहेब गवळी - 5775(महाडिक पॅनल)
भारत सुतकर - 2275(राजन पाटील पॅनल)
आघाडी : 3500


महिला राखीव


सिंधू जाधव - 5861(महाडिक पॅनल)
अर्चना घाडगे -2230(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3631


महिला राखीव


प्रतीक्षा शिंदे - 5709 (महाडिक पॅनल)
सुहासिनी चव्हाण - 2192(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3517


इतर मागास प्रवर्ग


अनिल गवळी -5900 (महाडिक पॅनल)
राजाभाऊ भंडारे - 2231(राजन पाटील पॅनल)
आघाडी : 3669


भटक्या विमुक्त जाती जमाती


सिद्राम मदने - 5842 (महाडिक पॅनल)
राजू गावडे - 2215(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3627

इंग्लंड-पाकिस्तान मॅचवर सट्टा, बीडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

Beed News Update : इंग्लंड-पाकिस्तान मॅचवर सट्टा लावल्याप्रकणी बीडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. इंग्लंड-पाकिस्तानमध्ये टी20 वर्ल्डकपचा फायनल सामना सुरू असताना अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सट्टा लावण्यात येत होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून सट्टा लावणाऱ्या चौघा जणांना ताब्यात घेतले.  ऑनलाईन फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता क्रिकेटवर सट्टाही ऑनलाईन लावला जातो. हे सट्टेबहाद्दर एखाद्या वाहनात उंच डोंगरावर, आड रानात कुठेही बसून सट्टा घेतात. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील दस्तगीर वाढीतील शिवारात भाकरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये इंग्लंड-पाकिस्तान या फायनल टी ट्वेन्टी वर्ल्डकपच्या मॅचवर सट्टा सुरू होता. 

बेळगावमध्ये भात कापणीचे प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव 

बेळगाव : बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना  म्हाळेनट्टी गावात शेतात भात कापणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भात कापणीचा अनुभवही घेतला.
 हा संपूर्ण उपक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सेंद्रिय शेतीचे प्रणेते शिवाजी कागणीकर आणि अरुण बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. भात कापणी कशी करतात याचे प्रात्यक्षिक दाखवल्या  नंतर विद्यार्थ्यांनी हातात विळा घेऊन भात कापणीचा अनुभव घेतला. पेरणीच्या मोसमात याच विद्यार्थ्यांनी भात रोप लागवड करण्याचा अनुभव घेतला होता. सौर पॅनेल उर्जेद्वारे विहिरीतून गट शेतीसाठी पाण्याचे नियोजन (ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर) कसे केले जाते याचीही माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. सेंद्रिय पीक पद्धतीचे फायदे याविषयी  शिवाजी कागणीकर आणि अरुण बाळेकुंद्री यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकासमाधान केले. यावेळी मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे शिक्षक नीला आपटे, रुपाली हळदणकर, कांचन बाळेकुंद्री, अनुज बाळेकुंद्री आणि आयुष बाळेकुंद्री उपस्थित होते.  यावेळी म्हाळेंनट्टी गावातील शेतकरी राहुल पाटील यांनीही विद्यार्थ्यांना माहिती दिली.  

वीजपुरवठा बंद केल्याने बीडच्या संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाचा घेतला ताबा

शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाचा ताबा घेतलाय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा 33 केव्ही वीजकेंद्रातून बंद केलाल. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट 33 केव्ही उपकेंद्रावरच ताबा घेतलाय. रब्बीच्या पिकाची सध्या पेरणी झाली असून त्यासाठी पाण्याची आवश्यकता असताना गेल्या पाच दिवसांपासून या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. वारंवार मागणी करून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त झालेले शेतकरी थेट 33 केव्ही विजकेंद्रात आले होते.


विद्युत पुरवठा चालू करण्यावरून उपकेंद्रातील अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाढ झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं.  परंतु, जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाहीत असा पवित्र या शेतकऱ्यांनी घेतला होता.  

मंडणगड येथील व्यापाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा 

Ratnagiri News Update :  गेल्या दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आंबेत-म्हाप्रळ खाडीपूल हा वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आज मंडणगड शहर व्यापारी संघटनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे. मंडणगड तालुक्यातील रायगड जिल्ह्याशी जोडणारा सावित्री खाडीवरील आंबेत खाडीपूल हा गेल्या दोन वर्षांपासून वारंवार वाहतुकीसाठी बंद ठेवला जात आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व अन्य भागातून येणाऱ्या मालवाहतुकीच्या वाहनांना वळसा मारून लांबचा प्रवास करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही हा पूल बंद असल्याचा फटका बसत आहे. यापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन देखील प्रशासनाने अद्याप यावर कोणताच मार्ग काढला नसल्याने आज मंडणगड येथील व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. 

रत्नागिरीमधील भोस्ते पुलावरून अवजड वाहनांना बंदी, पूल कमकुवत झाल्याने बांधकाम विभागाचे आदेश

Ratnagiri News Update : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भोस्ते नदी पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. हा पूल कमकुवत झाल्याने या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घेतला आहे. खेड तालुक्यातील शिव, आष्टी, निळीक, कोंडीवली या गावांना तसेच खेड शहराला जोडणारा जगबुडी नदीवरील हा पूल आता धोकादायक बनत चालला आहे. मुंबई-गोवा महामार्ग व खेड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश काढल्याने या पुलावरून सद्यस्थितीला केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. 

नागपुरात कथित ड्रग पेडलरची हत्या; लश्करीबाग परिसरातील घटना

Nagpur : शहरातील लश्करीबाग परिसरात एका कथित ड्रग पेडलरची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार रोहन बिहाडे पाचपावली परिसरात ड्रग तस्करीमध्ये सक्रिय होता. तो रविवारी जुगारात 25 हजार रुपये जिंकला. त्यानंतर बाबू बकरी, शॉंकी आणि अक्कू इंदूरकर यांच्यासोबत पार्टीसाठी सावजी भोजनालयात गेला. नंतर ते सर्व मध्यरात्रीच्या सुमारास लश्करीबाग परिसरात पोहोचले. त्यानंतर आरोपींनी रोहनवर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याला ठार केले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ऑक्टोबरमधील घाऊक महागाई दर 8.39 टक्क्यांवर, सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळणार 

Inflation : ऑक्टोबरमधील घाऊक महागाई दर 8.39 टक्क्यांवर, सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळणार 


किरकोळ महागाई दरातही घसरणीचे संकेत 


17 महिन्यांनंतर घाऊक महागाईत घसरण, वस्तूंच्या किंमतीत होत असलेल्या घसरणीनंतर मार्च 2021 नंतर सर्वात कमी 


सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दर होता 10.7 टक्के 


भाजीपाला आणि फळांचा महागाई दर 17.61 वर, सप्टेंबर महिन्यात फळं आणि भाजीपाल्यांचा महागाई दर 39.66 टक्के होता 


इंधन आणि ऊर्जा महागाई दर 23.17 टक्के, सप्टेंबर महिन्यात 32.61 टक्के होता

संजय राऊत यांचं मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात रुटिन चेकअप

Sanjay Raut : खासदार संजय राऊत हे आज (13 नोव्हेंबर) सकाळी रुटीन चेकअपसाठी मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलला गेले होते. तिथून काही वेळेतच ते चेकअप करुन निघाले आहेत. संजय राऊत हे तुरुंगातून घरी आल्यावर त्यांची तब्येत ठीक नव्हती असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते. याबाबत डॉक्टर तपासणी करतील आणि त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिल्यास अॅडमिट देखील होतील असेही त्यांच्या कुटुंबाने सांगितले होते. मात्र संजय राऊत यांनी आज तपासणी करुन काही वेळातच ते बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत ठीक असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मिळावी यासाठी स्वतःचं पोर्टल सुरू करणार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची सुनावणी दरम्यान मोठी घोषणा

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मिळावी यासाठी स्वतःचं पोर्टल सुरू करणार


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची सुनावणी दरम्यान मोठी घोषणा


देशातल्या हायकोर्टांना आरटीआय पोर्टल संदर्भात आदेश देण्यात यावे यासाठी याचिका होती


त्यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जी गोष्ट आम्हीच लागू केली नाही त्याबद्दल इतरांना काय आदेश देणार, लवकरच पाऊल उचलत असल्याचेही स्पष्ट केले

शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट तसेच विविध अधिकार मंडळाच्या 50 जागांसाठी आज मतदान, विद्यापीठ विकास आघाडी विरुद्ध शिव-शाहू आघाडी यांच्यात सामना

Kolhapur News : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट तसेच विविध अधिकार मंडळाच्या 50 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. कोल्हापूर शहराबरोबरच तीन जिल्ह्यातील 33 केंद्रांवर सकाळी नऊ वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत विद्यापीठ विकास आघाडी विरुद्ध शिव-शाहू आघाडी असा सामना रंगत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली आहे. शिव-शाहू आघाडीच्या माध्यमातून यावेळी पहिल्यांदाच ठाकरे गट देखील विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उतरला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असून शंभर उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी

Pune News : पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये वाद झाला आणि या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. पुणे स्टेशन परिसरात काल (13 नोव्हेंबर) घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. चालक, कंडक्टर आणि दुचाकीवरील व्यक्ती यांच्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसात पीएमपी चालकांवर हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले.

बँकॉक येथील जागतिक नृत्य स्पर्धेत बेळगावच्या विद्यार्थ्यांना कांस्य पदक
Belgaon News : बँकॉक येथे झालेल्या जागतिक नृत्य स्पर्धेत बेळगावच्या विद्यार्थ्यांनी कास्यपदक पटकावले. या स्पर्धेत जगभरातून आलेल्या अकराशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत अनेक फेऱ्यांमध्ये आपल्या नृत्य कलेचे दर्शन स्पर्धकांनी घडवले. प्रत्येक फेरीत बेळगावच्या स्पर्धकांनी उत्तम कला सादर करून परीक्षक आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 265 संघातून अंतिम फेरीसाठी केवळ 20 संघांची निवड करण्यात आली. यामधे बेळगावच्या संघाचा समावेश होता. अंतिम फेरीत बेळगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्याचे दर्शन घडवून कांस्य पदक पटकावले. हे सगळे विद्यार्थी बेळगावातील एम.स्टाईल अँड झुंबा फिटनेस डान्स अकादमीमध्ये नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. महेश जाधव यांचे नृत्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. कांस्य पदक जिंकून बेळगावला आल्यावर विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले
पुण्यातील दौंड पाटस मार्गावर भीषण अपघात, तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड पाटस मार्गावर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात झाला. रविवारी (13 नोव्हेंबर) रात्री ही घटना घडली. गणेश बापू शिंदे (वय 25 वर्षे), ऋषिकेश महादेव मोरे (वय 23 वर्षे) आणि स्वप्नील सतीश मनुचार्य (वय 24 वर्षे) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर दौंड शुगर कारखाना येथे जात होता. दुचाकीने ट्राॅलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्राॅलीला परावर्तक नसल्याने दुचाकी चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे..

मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी सुरु

Solapur News : मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी सुरु


सोलापुरातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या काडादी मंगल कार्यालयात सुरु आहे मतमोजणी 


भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील यांच्या पॅनलमध्ये लढत


सत्ताधारी धनंजय महाडिक राखणार सत्ता कि राजन पाटील घडवणार सत्ता बदल याकडे सर्वांचे लक्ष 


दोन फेऱ्यात 28 टेबलवर होणार मतमोजणी, 43 मतदान केंद्रावरील 56 बूथवर झाले आहे मतदान


काल झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 78.86 टक्के मतदारांनी बजावला आपला हक्क


15 जणांच्या संचालक मंडळासाठी 35 जण निवडणुकीच्या रिंगणात


निवडणुकांच्या प्रचार सभेत झालेल्या आरोप-प्रत्यरोप आणि वादग्रस्त विधानामुळे निवडणूक चर्चेत

Jitendra Awhad: मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

Jitendra Awhad: मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यकर्त्यांनाा रस्त्याच्या एका बाजूला नेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. 

पालघरच्या सफाळेमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

Palghar News : पालघरमधील सफाळेजवळील वेढी इथे तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. भूषण अशोक घरत या 31 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोर मौसम शेख याला सफाळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.

Jitendra Awhad: ठाणे: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा, मुंब्रामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रिक्षा बंद पाडण्यास सुरूवात

Jitendra Awhad: ठाणे: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा, मुंब्रामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रिक्षा बंद पाडण्यास सुरूवात, प्रवाशांची गैरसोय

कोल्हापुरात टोळीयुद्धातून राजेंद्रनगरच्या तरुणाचा पाठलाग करुन खून

Kolhapur News : टोळीयुद्धातून राजेंद्रनगरच्या तरुणाचा पाठलाग करुन खून केल्याची घटना घडली. कोल्हापूर शहरातील टाकाळा खण परिसरातील रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कुमार गायकवाड नावाच्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने सपासप 20 वार केले.

लोणावळ्यातील एअर फोर्स परिसरालगत विनापरवाना ड्रोन शूटिंग केल्याने एकावर गुन्हा दाखल

Pune News : लोणावळ्यातील एअर फोर्स परिसरालगत विनापरवाना ड्रोन शूटिंग केली म्हणून एकावर गुन्हा दाखल झाला आहे. राहुल बाळकृष्ण बडोले अस ड्रोन शूटिंग करणाऱ्याचे नाव आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत अतिसंवेदनशील भागात चित्रीकरणासाठी ड्रोन उडवले. अशा प्रकारच्या चित्रीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी लागते. मात्र राहुलने ती परवानगी घेतली नव्हती. टायगर पॉईंटच्या परिसरात तो चित्रीकरण करत होता. तेव्हाच त्याचं ड्रोन एअर फोर्स हद्दीलगत आढळून आलं. त्यामुळे त्याच्यावर भा.द.वि. कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतला आहे.

वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड येथून तीन पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त, दोघे ताब्यात





Sangli News : इस्लामपूर पोलीस दलातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तीन पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे. वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड गावच्या हद्दीतील खिंडीत सातारा आणि पुणे जिल्ह्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करत ही कारवाई करण्यात आली. दुचाकीसह देशी बनावटीची पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे असा दोन लाख दोन हजार रुपयांच्या हत्यारांचा साठा जप्त केला. ही प्राणघातक हत्यारे त्यांनी कुठून आणि कोणाकडून आणली, याची कसून चौकशी दोघांकडे करण्यात येत आहे.


 

 



 


पीएफआयशी संबंध असल्याच्या संशयावरुन एटीएसकडून मालेगावमधून एकाला अटक

Nashik News : दहशतवाद विरोधी पथकाने मालेगावमध्ये पुन्हा कारवाई करत रात्री आणखी एकाला अटक केली आहे. मौलाना इरफान दौलत नदवी यांना एटीएसने अटोक केली आहे. मौलाना इरफान नदवी हे इमाम कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी बंदी घातलेल्या पीएफआयशी संबंध असल्याच्या संशयावरुन त्यांना अटक करण्यात आली असून आज जिल्ह्य न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

G20 Summit 2022 : पंतप्रधान मोदी G20 शिखर संमेलनासाठी बाली दौऱ्यावर... ऋषी सुनक यांच्यासह 10 राष्ट्रप्रमुखांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडोनेशियामधील ( Indonesia ) बाली ( Bali ) शहरात जी20 शिखर संमेलनात ( G20 Summit 2022 ) सहभागी होतील. हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. पंतप्रधान आज दौऱ्यासाठी रवाना होतील. शिखर संमेलनात विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आरोग्य, साथीच्या रोगानंतरची आर्थिक आपप्ती, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. या परिषदेत आव्हानांना तोंड देण्यासाठी या शिखर परिषदेत भारत आपला दृष्टीकोन मांडणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याच्या ट्विट केलं आहे. यामळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

नागपूर विद्यापीठात भीती निर्माण करुन एका प्राध्यपकाने सात प्राध्यापकांकडून खंडणी केली वसूल, प्राध्यापकांची कुलगुरूंकडे लेखी तक्रार

Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांनी विद्यापीठातील एका प्राध्यापकाच्या विरोधात भीती निर्माण करुन खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. याबाबत सात प्राध्यपकांनी एका प्राध्यापकाच्या विरोधात कुलगुरूंकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सातही प्राध्यापकांविरोधात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाची तक्रार आली आहे, अशी भीती  निर्माण करून त्या प्राध्यापकाने लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याची तक्रार या सातही प्राध्यापकांनी लेखी स्वरुपात कुलगुरूंकडे केली आहे. भीती निर्माण करून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या त्या प्राध्यापकाची चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावे. त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या लेखी तक्रारीत करण्यात आली आहे. 

Jawaharlal Nehru Birth Anniversary : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती

Jawaharlal Nehru Birth Anniversary : आज 14 नोव्हेंबर. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. विद्यार्थीदशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण

Jitendra Awhad : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा अडचणीत आले असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण (Woman Molestation Case) समोर आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण, आठवडाभरात दुसरा गुन्हा


रविवारी संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते.

Beed News : बीडमध्ये बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्र तयार करून घेणाऱ्या 69 जनावर फौजदारी गुन्हे दाखल

Beed News : बीडच्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातून अनेक जणांना बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्र दिल्याची बाब उघड झाली आहे. बनावट फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र तयार करून घेणाऱ्या 69 जणांवर आरोग्य उपसंचालक यांच्या आदेशानुसार बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


बीडच्या जिल्हा हिवताप कार्यालयातून अनेक जणांना बोगस प्रमाणपत्राचे वाटप झाला आहे अशा तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानुसार आरोग्य विभागाने याबाबत एक चौकशी समिती गठित केली होती आणि याच चौकशी समितीच्या अहवालातून बीडमध्ये बोगस फवारणी प्रमाणपत्राचे वाटप झाल्याचा समोर आला आहे त्यामुळे अशा 69 जणांवर आरोग्य उपसंचालक यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

या सर्व प्रकरणानंतर बीडच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कारभार चव्हाट्यावर आला असून स्वतः आरोग्य उपसंचालक यामध्ये फिर्यादी आहेत आणि त्यांच्याच फिर्यादीवरून बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्या 69 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण, आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल


Jitendra Awhad : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा अडचणीत आले असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण (Woman Molestation Case) समोर आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


Nana Patole : नोटबंदीच्या काळात जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार, ते पैसे भाजपच्या घरात, नाना पटोलेंचा आरोप 


Nana Patole : जगातील आणि देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार नोटबंदीच्या काळात झाला आहे. ते पैसे भाजपच्या घरात गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर (BJP Govt) जोरदार हल्लाबोल केला. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना बदनाम केले, पण आता लोकांना वास्तव काय ते लक्षात आलं असल्याचे पटोले म्हणाले.


भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस 


रविवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. आज सकाळी  6.30 वाजता कळमनुरी, हिंगोलीतून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता हिंगोलीतील माळहीवरा येथे कॉर्नर सभा होणार आहे आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम असणार आहे. 


नामनिर्देशित 12 आमदारांच्या याचिकेसंबंधी आज सुनावणी 


विधान परिषदेवरील 12 नामनिर्देशित आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीसंदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्धात बारगळलेल्या नियुक्त्या सरकार बदललं तरीही अद्याप प्रलंबितच आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं जुनी यादी रद्द केली असली तरी नव्या नियुक्त्या कधी हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 
 
ऑक्टोबरमधील महागाईच्या दराचे आकडे जाहीर होणार 


ऑक्टोबरमधील महागाई दराचे आकडे आज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केले जाणार आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढ झाली आहे की सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला हे यातून कळणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल असं भाकीत वर्तवलंय. त्यामुळे महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.