Maharashtra News Updates 10 October 2022 : शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह 'मशाल'

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 11 Oct 2022 10:42 AM
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती


केंद्र सरकारनं जारा केली अधिसूचना


30 सप्टेंबरच्या बैठकीत सर न्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली न्यायवृंदानं केला होती शिफारस

Breaking News : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट 

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट 


मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने (सीआययू) सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती  आणि निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली


भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खैराती खान यांच्या विरोधात 37 व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्ट) सीआयुतर्फे 500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं


ज्यात भारती आणि फटांगरे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत आणि एफआयआरमध्ये या दोघांविरुद्धचे लावलेले आरोप हे चुकीच्या हेतूनं  केले गेल्याचं मान्य


रेश्मावर बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून भारतीय  पासपोर्ट प्राधिकरणाला दिल्याचा आरोप आहे 


मात्र तपासानंतक ती बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप खोटा असून ती बिहारचीच असल्याची माहिती स्पष्ट


मालवणी पोलिसांनी डिसेंबर 2021 मध्ये भारती, रेश्मा आणि फटांगरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध  कलमांखाली गुन्हा दाखल केला होता


देवेन भारती त्यावेळी सह पोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) होते


त्यांच्यावर विशेष शाखेच्या एका पोलीस निरीक्षकावर रेश्मा विरुद्ध प्रकरणाचा पाठपुरावा न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता

बसच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू, कारंजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दुर्दैवी अपघात
अमरावतीकडून नागपूर दिशेने जात असलेल्या एसटी बसने कारंजात दुचाकीला जबर धडक दिली, यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास महामार्गावरील  पेट्रोल पंपच्या समोर हा अपघात झालाय.यात रामदास भलावी वय 65 वर्ष, रा मेटहिरजी यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रल्हाद युवनाते वय 40 वर्ष राहणार मेटहिरजी यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.. दोघेही कारंजा येथील पंचायत समितीमध्ये आपले काम आटपून दुचाकीने  कारंजाकडून आपल्या गावाला जात असताना महामार्गावर हा दुर्दैवी अपघात घडला आहे..

 
येणार्‍या निवडणुकीत जनता या गटाला व भाजपला धडा नक्की शिकवणार. -  Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो

ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली, नाव आणि चिन्ह गोठवले, त्यांना 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव दिलं गेलंय.
आदरणीय बाळासाहेब यांना मानणारी महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणार नाही आणि यांना माफदेखील करणार नाही.
येणार्‍या निवडणुकीत जनता या गटाला व भाजपला धडा नक्की शिकवणार. -  Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो

Sangli News: कवठेमहांकाळ पोलिसांनी हस्ती दंत तस्करी करणारी टोळी गजाआड, तब्बल 20 लाखाचे दोन हस्तीदंत ताब्यात 
Sangli News:  हस्ती दंत तस्करी करणारी टोळी  कवठेमहांकाळ पोलिसांनी गजाआड केली आहे. तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आले आहे.   कवठेमहांकाळ पोलिसांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली. खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रोडलगत गिरनार तपोवन मठाच्या येथे झाडाझुडपात हत्तीचे हस्त दंत घेऊन थांबलेले आढळून आले. कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना अटक केली आहे. कोल्हापूर येथून हस्ती दंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगली मधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक करून त्याच्यावर वन्य जीव कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे. सांगली, कोल्हापूर, आणि कर्नाटक मध्ये तपास करून आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक मनीषा डुबले यांनी सांगितले. राहुल रायकर, बालाजी बनसोडे  हे दोघे कोल्हापुर मधील तर कासीम काझी, मिरज तर हणमंत वाघमोडे हा कर्नाटक मधील रहिवासी आहेत.
Beed News: बीडच्या गेवराई शहरात बर्निंग मोटरसायकलचा थरार
बीडच्या गेवराई शहरातील नवीन बस स्थानकासमोर एका दुचाकीन अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही दुचाकी अचानक पेटल्याने या परिसरातील दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली होती.. स्थानिकांनी पाणी टाकून ही मोटरसायकल विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे अग्निशमन दलाच्या साहाय्याने या मोटरसायकल लागलेली आग विझवण्यात आली आहे..

 
एसटीला डिझेल उपलब्ध नसल्याने बारामती आगाराची वाहतूक दुपारी 2 तास विस्कळीत




एसटीला डिझेल उपलब्ध नसल्याने बारामती आगाराची वाहतूक दुपारी 2 तास विस्कळीत झाली होती.. दुपारी 12 ते 2 या वेळेत बारामती आगराच्या गाड्या एसटी स्टॅण्ड मधून बाहेर पडल्या नाहीत.. आता देखील डिझेल पंपावर एसटीच्या रांगा लागल्या आहेत. जस डिझेल उपलब्ध होईल तशा गाड्या सोडल्या गेल्याचे बारामती आगार प्रमुखांनी सांगितले.. अर्धातासात वाहतूक पुन्हा पूर्ववत केली असल्याचे बारामती आगार प्रमुख मनीषा गायकवाड यांनी सांगितले.

 

 



 


शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह 'मशाल'

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे यांना 'मशाल' हे चिन्ह मिळालं असून त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब हे नाव मिळालं आहे. 

युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाकडून अॅडव्हायजरी जारी 

कीव्हमधील भारतीय दूतावासाने युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील त्यांच्या उपस्थितीच्या स्थितीबद्दल भारतीय दूतावासाला माहिती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.





कोल्हापूर : 1 हजार चौ.मी. इमारत बांधकाम परवानगीसाठी 13 व 14 ऑक्टोबरला विशेष शिबीर

कोल्हापूर मनपा क्षेत्रातील ऑनलाईन दाखल झालेल्या विकास परवानगीसाठी (इमारत बांधकाम व भोगवटा) 13 व 14 ऑक्टोंबर 2022 रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये 1 हजार चौ.मी. भूखंड क्षेत्रापर्यंतची विकास प्रकरणे घेतली जाणार आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार या दोन दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हा विशेष कॅम्प घेतला जाणार आहे. 


या कॅम्पमध्ये विविध प्रकारचे विकास परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम परत, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनची कामे केली जाणार आहेत. तरी संबंधितांनी सदरच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी दि.13 व 14 ऑक्टोबर 2022 रोजी नगररचना विभाग, दुसरा मजला, बागल मार्केट, राजारामपुरी येथे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून संबधितांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगररचना विभागाकडून करण्यात आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल

दिल्ली उच्च न्यायालयात शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल, ठाकरे गटाच्या आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेनंतर याचिका दाखल, आमची बाजू  ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये

भंडाऱ्यात दमदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना फटका 

भंडारा : भंडाऱ्यात सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या दमदार पावसामुळे हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या धान पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी धान कापलेले आहेत. तर, काहींच्या शेतात धान कापणीला सुरुवात होत आहे. अशा स्थितीत या दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. धान पिकासह पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वत्र या पावसाने हजेरी लावली आहे.  एकीकडे पिकांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असतानाच या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या अशाही मावळण्याच्या मार्गावर आहेत.  

Nashik Rain : नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ 

Nashik Rain : नाशिकमध्ये दोन दिवसांच्या विश्रंतीनंतर आज पुन्हा सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी कामावरून घरी निघालेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडवली. यावेळी शहरातील सीबीएस, मुंबई नाका, पंचवटी, गंगापूर रोड आदी परिसरात परतीच्या पावसाने जोरदार कमबॅक केले. अनेक उंचसखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकांनी रेनकोट घरी ठेऊन दिल्याने आज पावसामुळे आडोसा घेण्याची वेळ नाशिककरांवर आली. 

मध्यान भोजन योजना बंद करण्यासाठी बीडमध्ये कामगारांचा भव्य मोर्चा

मध्यान भोजन योजना बंद करून प्रत्येक कामगाराच्या खात्यावर महिन्याला दोन हजार रुपये द्यावेत या मागणीसाठी बीड मधील बांधकाम कामगारांनी कामगार कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कामगारांच्या हितासाठी राज्य शासनाकडून मध्यान भोजन योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याचा फायदा या कामगारांना होत नसल्याने ही योजना बंद करून महिन्याला दोन हजार रुपये कामगारांच्या खात्यावर द्यावेत अशी मागणी या कामगारांनी या मोर्चात सहभागी होऊन केली आहे. 

चांदणी चौक येथील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी आणि नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे.

लोकशाहीचा खून करणाऱ्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी एकत्र येणे हे काळाची गरज : नाना पाटोले

अंधेरी येथील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.  


महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने ज्या काही पोटनिवडणुका लागतील त्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला सपोर्ट करण्याचा निर्णय झाला होता. कालच सोनिया गांधी यांनी या विषयाला मान्यता दिली आहे आणि अंधेरी पोट निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्ष सोबत उभा राहील.


भाजप देशात लोकशाहीचा दररोज खून करते आहे. अशा लोकशाहीचा खून करणाऱ्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी एकत्र येणे हे काळाची गरज आहे. म्हणून सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आणि तो निर्णय सांगण्यासाठी आम्ही इथे आलो. 


 अंधेरीच्या जागेवर उद्धव ठाकरे यांचा उमेदवार 50 ते 60 हजाराच्या फरकाने निवडून येणार आहे. 

Belgaum News : बेळगाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपले

Belgaum News : अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. दीड तासाहून अधिक काळ पावसाने झोडपून काढले. परतीच्या पावसाचा भात पिकाला फटका बसला आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठले होते शहरातील प्रमुख चौक असणाऱ्या राणी कितुर चन्नमा चौकात एक फुटाहून अधिक पाणी साठल्याने वाहनं चालकांना त्यातून वाहने चालवणे अवघड झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे खरेदीसाठी परगावाहून आलेल्या लोकांना देखील आसरा शोधावा लागला. गेल्या दोन दिवसापासून बेळगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासून सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. अचानक दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि काही काळ जनजीवन स्तब्ध झाले.

खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 7 दिवसांनी वाढवली

Sanjay Raut Custody : खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 7 दिवसांनी वाढवली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी आज राऊतांची न्यायालयीन कोठडीही संपत असल्यानं त्यांना आज कोर्टापुढे हजर करण्यात आलं आहे. परंतु न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही आणि त्यांची न्यायालयीन कोठडी 17 ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

Sanjay Raut: संजय राऊत यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावरील सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत तहकूब, न्यायालयीन कोठडी 7 दिवसांनी वाढवली

Sanjay Raut:  संजय राऊत यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावरील सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत तहकूब, न्यायालयीन कोठडी 7 दिवसांनी वाढवली

Aurangabad Rain: औरंगाबाद शहरातील अनेक भागात पावसाला सुरवात

Aurangabad: मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात आज पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार आता औरंगाबाद शहरातील अनेक भागात पावसाला सुरवात झाली आहे. शहरातील निराला बाजार, कटकट गेटसह अनेक भागात पाऊस कोसळत आहे. तर ग्रामीण भागात सुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. 



Baramati News : बारामती शहरात वाढदिवसाच्या दिवशी 3 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू

Baramati News : बारामती शहरात वाढदिवसाच्या दिवशी 3 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अरद थोरात अस मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अरद हा त्याच्या आईसोबत बौद्ध मेळाव्यात गाणी ऐकण्यासाठी निघाला होता. हा कार्यक्रम बारामतीतील आंबेडकर पुतळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बारामती इंदापूर रस्त्यावर कार्यक्रम स्थळी जाताना वाहतूक वळवण्यात आली होती. शिडी लावून रस्ता बंद करण्यात आला होता. अरद हा त्याच्या आईसोबत रस्ता ओलांडत असताना एक भरधाव वेगाने मोटार सायकल आली. त्या भरधाव वेगाने आलेल्या मोटार सायकलने रस्त्यात आडवी लावलेल्या शिडीला धडक दिली. तीच लोखंडी शिडी अरदच्या डोक्यात लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. संकेत खळदकर अस भरधाव वेगाने जाणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कालच अरदचा वाढदिवस असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

Sindhudurg News : सिंधुदुर्गात सकाळपासून संततधार पाऊस

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून कणकवली, कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. मागील पाच ते सहा महिने मेहनत घेऊन पिकवलेलं भात शेतीचे पीक आता कापणीसाठी परिपक्व झालं असताना अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे जातो की, काय अशी भीती शेतकऱ्याला वाटू लागली आहे. परतीच्या पावसामुळे भातशेती धोक्यात आली आहे. 

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर

Sindhudurg News : देशातील सहकारी बँकिंग संस्थांचे आर्थिक मूल्यमापन करून त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक यांच्यामार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए 2022 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार मध्यप्रदेश इंदोर येथे उद्या प्रदान करण्यात येणार आहे. बँकांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांनी केलेल्या प्रगतीच्या आधारे तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक सेवा इत्यादी बाबी विचारात घेऊन विविध कॅटेगिरीमधील पुरस्कारां साठी संबंधित बँकांची निवड करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कोअर बँकिंग सुविधा व स्वतःचे डाटा सेंटर उभारून ग्राहकांना, व्यापारी बँकांच्या बरोबरीने जिल्ह्यात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या दुर्गम भागातही असलेल्या शाखा सीबीएस संगणकिकृत केल्या आहेत. त्यामुळे एफसीबीए 2022 च्या निवड समितीमध्ये जिल्हा बँकेला पुरस्कार देण्यात येणार आहे.

Beed News : अज्ञात कारणानं बीडच्या घाटनांदूरमध्ये 30 शेळ्यांचा मृत्यू

Beed News : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे अज्ञात कारणानं 30 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घाटनांदुर ते दौंडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला या शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या असून याच ठिकाणी इतर 80 शेळ्या देखील अत्यावस्थ अवस्थेत आढळून आल्याने त्यांचा देखील मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


या शेळ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांच लाखो रुपयांच नुकसान झालंय, तर शेळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने मात्र पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
Beed News : पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंदीच्या निर्णयाविरोधात बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं

Beed News : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याच्याच निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षण बचाव नागरिक समितीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.


बीड जिल्ह्यात पटसंख्या कमी असलेल्या 633 शाळा असून राज्यभरात 13 हजार 500 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे त्यामुळे या शाळा जर बंद झाल्या तर वाडी वस्ती तांड्यावर शिक्षण घेणाऱ्या मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये शिक्षण बचाव समितीचे कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.

नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीचे आरक्षण सोडत संपन्न

Nandurbar Panchayat Samiti and ZP Election : नंदुरबार जिल्ह्यातील 6 पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यापैकी तीन पंचायत समितीवर महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी 13 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार, नवापूर, तळोदा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण महिलांसाठी राखीव आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती सभापती निवडीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी पूर्ण केल्या असून आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना सहलीसाठी पाठवले आहे. जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा पंचायत समितीत सत्तांतर होण्याची शक्यता आहे तर अक्कलकुवा आणि धडगाव नवापूर पंचायत समितीत जैसे थे परिस्थिती राहील. तळोदा पंचायत समिती मध्ये भाजपाकडे पाच तर काँग्रेसकडे पाच सदस्य संख्या असल्याने त्या ठिकाणी दोघी पक्षांमध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याने आता तळोदा पंचायत समितीचे सभापती हा काँग्रेसचा होईल सभापती निवडी साठी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 

Ahmednagar News: कोपरगाव: अनेकांना जखमी करणाऱ्या गायीला तरूणांनी धाडस करून पकडले

Ahmednagar News: कोपरगाव शहरात एका बिथरलेल्या गाईने उच्छाद मांडून नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अनेक नागरिकांना जखमी करणाऱ्या या गाईला पकडण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी दोन दिवसांपासून प्रयत्न करत होते. मात्र ही गाय काही केल्या हाथी लागत नव्हती. अखेर काही तरुणांनी धाडस करून ही मारकी गाय पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वाव टाकला. यानंतर नगर परिषदेने या गायीला गोशाळेत सोडले आहे.

Shirdi News: शिर्डी महामार्गावरील खड्ड्यात बसून लिहिले नितीन गडकरींना पत्र

Shirdi News: मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड महामार्गावर महाकाय खड्डे पडल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पेशाने वकिली करणारे नितीन पोळ यांनी चक्क महामार्गावर असलेल्या खड्ड्यात बसून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले. नगर मनमाड महामार्गावरून प्रवास करण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून गडकरी यांना करण्यात आली आहे.

Bhandara Gram Panchayat Election : भंडाऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या बिगुल वाजलं, 16 ऑक्टोबरला मतदान, 19 ग्रामपंचायतिची निवडणूक होणार

Bhandara Gram Panchayat Election : भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतिच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतिच्या निवडणूक होणार आहे. यासाठी 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 16 ग्रामपंचायती भंडारा तालुक्यातील असून साकोली, पवनी आणि तुमसर प्रत्येकी एक एक ग्रामपंचायतिच्या निवडनुक आहेत. यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे यांना आज अयोध्येत येण्याचं निमंत्रण, अयोध्येतील महंतांनी घेतली भेट

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज अयोध्येत येण्याचं निमंत्रण अयोध्येतील महंतांनी दिलंय. अयोध्येच्या हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज आणि उदासीन आखाड्याचे महंत श्री धर्मदास महाराज यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. याआधी राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरेंनी दौरा रद्द केला होता. बृजभूषण यांच्या विरोधानंतर आता अयोध्येतील महंतांनी राज यांची भेट घेतली. राज ठाकरे धर्माचे सैनिक आहेत, असं सांगत महंतांनी त्यांना अयोध्या दौरा करण्याचं निमंत्रण दिलंय.

Shivsena Symbol : ठाकरे गटाच्या चिन्हावर शिंदे गटाचाही दावा, शिंदे गटाच्या तीन पर्यायांमध्ये पण त्रिशुळ आणि उगवता सूर्य

Aaditya Thackeray on Shinde Group : राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

  • राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

  • महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरु झालंय : आदित्य ठाकरे

  • गद्दारांना सगळं दिलं तरी पक्ष संपवायचाय : आदित्य ठाकरे


 

किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दट्टा, जर प्रशासनानं याप्रकरणी पडताळणीचे निर्देश दिलेत तर त्याला विरोध कशाला?, हायकोर्टाचा सवाल

खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी अनेक शिवसैनिक कोर्टात पोहोचले आहेत

Mumbai News : खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी अनेक शिवसैनिक कोर्टात पोहोचले आहेत


दसरा मेळाव्यानंतर आज पाहिल्यांदाच संजय राऊत यांची कोर्टापुढे हजेरी आहे


लालबाग-परळ परिसरातून अनेक शिवसैनिक कोर्ट परिसरात आले आहेत 


दगडू सकपाळ, आमदार सुनील राऊत देखील मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Anil Deshmukh Bail : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंमलबजावणी संचालनालयानं (ED) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 



Shiv Sena Symbol Crisis : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना दिल्ली हायकोर्टात

Shiv Sena Symbol Crisis : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं. त्याविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली असून निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय.



उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे.  गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

सांगलीच्या जत तालुक्यातील बिळुर इथे घराच्या मागे असणाऱ्या एका तलावात आई आणि तीन मुलींचा मृतदेह सापडला, आत्महत्या की अपघात याची अद्याप स्पष्टता नाही

Sangli News : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील बिळुर इथे घराच्या मागे असणाऱ्या एका तलावात महिला आणि तीन मुलींचा मृतदेह सापडला. ही आत्महत्या आहे की अपघात याची अद्याप स्पष्टता नाही. चारही पार्थिव तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जतच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांमध्ये सुनीता माळी (वय 30 वर्षे),  अमृता माळी (वय 13 वर्षे) अश्विनी माळी (वय 10 वर्षे) आणि ऐश्वर्या माळी (वय 7 वर्षेः) यांचा समावेश आहे.

नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील चोंडी इथे अजगराने शेळी गिळंकृत केली
Hingoli News : नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील चोंडी या गावच्या शिवारामध्ये जवळपास 12 फूट लांबीच्या अजगराने चक्क शेळी गिळंकृत केली. चोंडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर घंटेवाड यांच्या शेळीवर हल्ला करुन अजगराने शेळी गिळली. त्यावेळी गावातील नागरिक दत्ता कदम यांनी या अजगराविषयी सर्पमित्राला माहिती दिली. तर सर्पमित्रांनी वन विभागाच्या स्वाधीन या अजगराला करुन त्याची सुखरुप सुटका केली. दरम्यान धर्माबाद तालुक्यात मागच्या महिनाभरात सहा अजगर सापडले असून नागरिक त्याला न मारता सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यापुढे साप निघाल्यास त्यास न मारता वनविभाग किंवा सर्पमित्रास काळविण्याचे आवाहन वनविभागाने केले आले.
उल्हासनगरात हरवलेली 5 मुले पोलिसांनी काही तासातच शोधून पालकांकडे सुपूर्द केली
Ulhasnagar News : एकाच परिसरातील विविध इमारतीत काम करणाऱ्या तीन वॉचमनची पाच लहान मुले हे फिरताफिरता घरापासून लांब निघून गेली होती आणि ही मुले स्वतःच्या घराचा पत्ता विसरल्यामुळे हरवले होते. पालकांना समजलं की आपले मुलं हरवले आहेत तेव्हा ही माहिती पोलिसांना दिली, आणि तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी तपास करत या पाचही मुलांना शोधून त्यांचे पालक असणाऱ्या वॉचमनच्या सुपूर्द केले. उल्हासनगरातील सी.ब्लॉक परिसरात पाच लहान मुले रडत असून त्यांना त्यांच्या घरचा पत्ता माहित नसल्याची माहिती मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना समजली. यानंतर पोलिसांचीने टीम सी.ब्लॉक परिसर गाठलैा. या मुलांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना खाऊ दिला. त्यांच्याशी गोड बोलून त्यांचे वडील काय काम करतात याची माहिती विचारली. तेव्हा व्हिनस परिसरातील वॉचमन असे सांगितल्यावर पोलिसांनी विचारपूस केली आणि मुलांच्या वडिलांचा पत्ता मिळताच त्यांना त्यांना पालकांकडे सुपूर्द केलं. या मुलांमध्ये रमेश थापा यांची तीन, पदम विश्वकर्मा, प्रकाश परिवार यांच्या प्रत्येकी एक मुलाचा समावेश आहे. त्यांचे वय 2 ते 5 वर्षे असे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. वॉचमन मुलांची शोधाशोध करत होते. मध्यवर्ती पोलिसांनी त्यांची मुले सुपूर्द केल्यावर ते सुखावून गेले होते.
मुख्यमंत्र्यांकडून परभणीतील माहेरवासियांची दखल, तात्काळ रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Parbhani News : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील "माहेर" गाववासियांनी रस्त्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून संघर्ष केला जो अखेर फळाला आला असून गावकऱ्यांच्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी प्रवीण देशमुख यांनी गावकऱ्यांच्या रस्ता समस्येबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ या रस्त्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले असून प्रस्ताव येताच निधी मंजूर करुन रस्त्याच्या कामालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठीचा माहेरवासियांचा अनेक वर्षांपासूनचा संघर्ष यंदा थांबणार आहे.

बुलढाण्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर खाजगी बस आणि रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परमध्ये धडक, सहा प्रवासी जखमी

Buldhana News : बुलढाण्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस आणि रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परमध्ये अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खाजगी बस पुण्याहून शेगावकडे जात असताना बसला समोरुन वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. अपघातानंतर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक पसार झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याच मार्गावर तीन दिवसात दोन लक्झरी बसला अपघात झाला होता.



Buldhana News : खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस आणि रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परमध्ये अपघात

Buldhana News : शेगाव - खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस आणि रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परमध्ये अपघात.


अपघातात सहा प्रवासी जखमी , जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.


खाजगी बस पुण्याहून शेगाव कडे जात असताना बसला समोरून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने ने धडक दिली.


अपघातानंतर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक फरार , पोलीस घटनास्थळी दाखल.


याच मार्गावर तीन दिवसात दोन लक्झरी बसला अपघात

Maharashtra Politics : चिन्हासाठी निवडणूक आयोगाच्या दारी ठाकरे-शिंदे यांच्यात घमासान, आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Politics : धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला आज दुपारी 1 वाजेपर्यंत चिन्ह आणि नावांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हाचे पर्याय दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हाला प्राधान्य असल्याची चर्चा आहे.. तसंच पक्षाच्या नावात शिंदे गट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा उल्लेख ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहितील दिलेली नाही. वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय. आज दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट आयोगाकडे कोणती चिन्हं आणि नावांचा पर्याय देणार याकडं लक्ष लागलंय. 

Maharashtra Rain Update : राज्यात मध्यम पावसाची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यालाही झोडपणार

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून मागील तीन दिवस राज्यभरात पावसाची रिपरिप (Rain Update) पाहायला मिळाली. राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 'स्कायमेट' संस्थेच्या अंदाजानुसार, राज्यात आजही पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाच्या (Light to Moderate Rain) सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

उल्हासनगर : पोलिसांनी हरवलेली 5 मुले पालकांकडे सुपूर्द केली

एकाच परिसरातील विविध इमारतीत काम करणाऱ्या तीन वॉचमनची 5 लहान मुले हे फिरताफिरता घरापासून लांब निघून गेली होती आणि हे मुलं स्वतःचा घरचा पत्ता विसरल्यामुळे हरवली होती. जेव्हा पालकांना समजलं की आपले मुलं हरवली आहेत तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी तपास करत या पाच ही मुलांना शोधून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केली.

नंदुरबारमध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू

नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यांतील दुर्गम भागातील अस्तंबा येथे दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आमदार के.सी.पाडवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होणार आहे. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच डीपीडीसीची बैठक होत आहे. नाशिकच्या साधारणपणे 600 कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती आज उठणार का?  सुहास कांदे यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती.

मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी

मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी होणार आहे. साध्वी प्रज्ञाशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांची सध्या उलट तपासणी सुरू आहे. 

मुंबई गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी

मुंबई-गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

दिल्लीत आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक

आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक आज सकाळी 11 वाजता. होणार आहे. या बैठकीत लालू प्रसाद यादव आठव्यांदा पक्षाचे अध्यक्ष होतील. 

रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन

मुंबईत रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मोकळ आयुष्य जगण्यापासून वंचित असलेल्या वृद्धांसाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे. 

निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देणार

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांतर निवडणूक आयोगाने दोन्ही  गटांना तीन चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावं देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाने तीन चिन्ह आणि तीन नावे सुचवली आहेत. उद्या शिंदे गट आपले नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्यानंतर दुपारनंतर निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देईल. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देणार


शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांतर निवडणूक आयोगाने दोन्ही  गटांना तीन चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावं देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाने तीन चिन्ह आणि तीन नावे सुचवली आहेत. उद्या शिंदे गट आपले नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्यानंतर दुपारनंतर निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देईल. 


रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन 


मुंबईत रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मोकळ आयुष्य जगण्यापासून वंचित असलेल्या वृद्धांसाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे. 


दिल्लीत आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक 


आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक आज सकाळी 11 वाजता. होणार आहे. या बैठकीत लालू प्रसाद यादव 8 व्यांदा पक्षाचे अध्यक्ष होतील 


मुंबई गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी 


मुंबई-गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी


मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी होणार आहे. साध्वी प्रज्ञाशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांची सध्या उलट तपासणी सुरू आहे- अमेय
 
भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर दौऱ्यावर 


भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आज कोल्हापुरात आहेत.  


नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक


पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होणार आहे. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच डीपीडीसीची बैठक होत आहे. नाशिकच्या साधारणपणे ६०० कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती आज उठणार का?  सुहास कांदे यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती.
 
मनसे नेते अमित ठाकरे हिंगोली  जिल्हा दौऱ्यावर


मनसे नेते अमित ठाकरे हिंगोली  जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांना ते हजेरी लावतील. तसेच,  नरसी नामदेव आणि औंढा नागनाथ या दोन्हीही ठिकाणी अमित ठाकरे दर्शन घेणार आहेत. 
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला आणि अमरावतीच्या दौऱ्यावर
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला आणि अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहतील. 
 
वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन


महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी, ओबीसी संघटना व विद्यार्थी सहभागी होणार आहेत, दुपारी १ वाजता. 
 
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन


पंतप्रधान मोदींच्या हस्ते भरुच येथे उद्घाटन होणार आहे, सकाळी 11 वाजता. तसेच अहमदाबाद येथे शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे, दुपारी 3.15 वाजता. त्यानंतर जामनगर येथे विविध योजनांचं लोकार्पण होणार आहे, संध्याकाळी 5.30 वाजता. 


भारतीय दूतावासाकडून युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायसरी जारी 


कीव्हमधील भारतीय दूतावासाने युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायसरी जारी केली आहे. भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील त्यांच्या उपस्थितीच्या स्थितीबद्दल भारतीय दूतावासाला माहिती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.