Maharashtra Breaking News 27 June 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jun 2022 11:22 PM
Nagpur Covid Update : सात कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार ; जिल्ह्यात 392 सक्रीय बाधित

नागपूरः जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सामान्य वाढ होत आहे. सोमवारी जिल्ह्यात 37 नवे बाधित आढळून आले. यात शहरातील 32 तर ग्रामीणमधील 5 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज 17 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या 7 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यापैकी तीन रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात, 2 रुग्ण मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये तर 2 रुग्ण वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर 385 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

Pune : जुना पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे फाट्यावर ट्रेलर आणि दुचाकीचा अपघात

Pune : जुना पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे फाट्यावर ट्रेलर आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. लहान बाळासह, आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बाळाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. लोणावळ्यातून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या दुचाकीला एका भरधाव ट्रेलरची मागून धडक बसून झालेल्या या अपघातात लहान बाळासह महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकी चालवणारी व्यक्ती गंभिर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले असून अपघातग्रस्त वाहने बाजुला केली आहेत.

Rahul Patil :  दोन दिवसांपासून राहुल पाटील नॉट रिचेबल

Rahul Patil :  दोन दिवसांपासून परभणीचे शिवसेना आमदार  राहुल पाटील नॉट रिचेबल आहे.  सूरतमार्गे राहुल पाटील गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे.  

Nashik News : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह 

Nashik News : नाशिकचे पालकमंत्री तथा मंत्री छगन भुजबळ याना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती कळवली आहे. भुजबळ यांच्या फेसबुक अकाऊंट वरून केलेल्या पोस्टमध्ये' माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. असे त्यांनी म्हटलं आहे. 

Dipali Sayyed : यंदाची आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होवो : दीपाली सय्यद यांचे पांडुरंगा चरणी साकडे

Dipali Sayyed : शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. दीपाली सय्यद यांनी जेजुरी ते वाल्हे पायी अंतर पार केलं. दोन वर्षांनंतर पायी वारी होत आहे. परंतु, राजकीय वातावरणामुळे वारीकडे दुर्लक्ष होत आहे. लवकरात लवकर ही परिस्थिती पूर्ववत होवो असे साकडेदेखील त्यांनी पांडुरंगा चरणी घातले आहे. तसेच यंदाची आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होवो असे साकडे देखील दीपाली सय्यद यांनी जेजुरीच्या खंडेरायाला घातले आहे. 

नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजनी रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस काही वेळ रोखून धरली, अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन  

नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजनी रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस काही वेळ रोखून धरली. संरक्षण विभागाच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी आंदोलन केले.  


आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेस अजनी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते थांबलेल्या रेल्वे समोर जाऊन झोपले. अग्निपथ योजना परत घ्यावी अशी मागणी करत यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.  रेल्वे पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि त्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. 

Chandrapur News Update : चंद्रपुरातील वरोरा येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात 

चंद्रपूर : वरोरा शहरातील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंत्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीनु चुक्का असे या अभियंत्याचे नाव आहे.  सहा हजार रूपयांची लाच घेताना चुक्का यांना अटक करण्यात आली. सोलर यंत्रणा उभारणाऱ्या कंत्राटदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.  ग्राहकाला सौर यंत्रणा किट देण्यासाठी लाच मागितली होती.  

Vinod Tawde : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे सहभागी; जेजुरी ते वाल्हे अंतर पायी पार केले

Vinod Tawde : माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी ते वाल्हे अंतर पायी पार केले. यावेळी गेल्या दोन वर्षांपासून पांडुरंग आणि भक्तांमध्ये एक वेगळी ताटातूट झाली होती. गेली 12-13 वर्ष मी जेजुरी ते वाल्हे चालत चालत असतो. परंतु, मागची दोन वर्ष चालता आले नाही. त्यामुळे चुकल्यासारखं वाटत होतं. परंतु, यंदा खूप आनंदात वारी सुरू असल्याची भावना विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी विनोद तावडे हे जेजुरी ते वाल्हे अंतर पायी पार करत असतात. दोन वर्षापासून कोरोनामुळे पायी वारी होऊ शकली नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी पायी वारीत विनोद तावडे सहभागी झालेत.

पुणे : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

पुण्याच्या बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. पीतबसा कमलचंद जानी अस खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा याच्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आले. आरोपी फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.

मराठीतून कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मोर्चा, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

Belgaon News : मराठीतून कागदपत्रे द्यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. सरदार हायस्कूल मैदानापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. अल्पसंख्यांक आयोगाच्या शिफारशीनुसार मराठीतून कागदपत्रे द्यावीत अशी मागणी वारंवार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मराठी भाषिकांना त्यांच्या हक्कापासून डावलले जात असल्याने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना समितीतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चाला सरदार हायस्कूल मैदानावरुन प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता होणार आहे

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास, घाटातील खचलेल्या भागातील माती सरकण्यास सुरुवात
Chiplun News : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा काही भाग खचला होता. याला वर्षे उलटलं तरी हा खचलेला भाग तसाच आहे. सध्या पावसाची रिमझिम सुरु आहे. या पावसात खचलेल्या भागातील माती हळूहळू खाली सरकू लागली आहे. अशा परिस्थितीतही परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे.
अमरावतीच्या परतवाडा तालुक्यातील सापन धरणात दोन युवतीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Amravati News : अमरावतीच्या परतवाडा तालुक्यातील सापन धरणात दोन युवतीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सापन धरणावर काल (26 जून) दुपारी एका युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर काही वेळातच दुसरा एका मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही मुली परतवाडाच्या कांडली येथील असून गायत्री पडोळे आणि हेमलता पाटे अशी त्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी यांच्या कुटुंबांनी या दोघी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गायत्री ही होमगार्ड असून या दोघीही मुली पोलीस भरतीची तयारी करत होत्या अशी माहिती मिळत आहे. धरणाच्या परिसरात या दोन्ही युवतीचे मृतदेह आढळल्याने हा घात की अपघात याचा तपास परतवाडा पोलीस करत आहे.

विरारमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, मनवेल पाडा गावात एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Virar News : विरारमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भर रस्त्यात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचे कारण समोर आले नसून काल रात्री साडेदहाच्या सुमारास विरार पूर्वेच्या मनवेल पाडा गावात लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना हाणामारी करण्यात आली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी परिसरात नागरिकांची एकच गर्दी निर्माण झाली होती. या व्हिडीओत पोलीस आल्याचे दिसत आहेत. हाणामारीच्या घटनेत वाढ होत असल्याने विरार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मनवेल पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे.आणि संध्याकाळच्या वेळी कामावरुन परतणाऱ्या चाकरमान्यांची ये-जा होत असते. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

देशभरात विविध ठिकाणी अग्नीपत योजनेविरोधात काँग्रेसकडून आंदोलन

देशभरात विविध ठिकाणी अग्नीपत योजनेला विरोध म्हणून काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. 

Presidential Elections 2022 : आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा अर्ज दाखल करणार

Presidential Elections 2022 : विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दुपारी 12.15  वाजता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या उपस्थितीत यशवंत सिन्हांची पत्रकार परिषद होणार आहे.

Maharashtra Political Crisis : आज संध्याकाळपर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता

Maharashtra Political Crisis : आज संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 16 आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, या आमदारांनी त्यांची बाजू न मांडल्यास त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. शिवसेनेनं या बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालावर ही पुढची कारवाई अवलंबून असेल. 

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

Eknath Shinde : शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे कॅम्पला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी यांच्या नियुक्तीलाही याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. तसेच, शिंदे कॅम्पच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.  यावर आज सुनावणी होणार आहे.  न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. तर, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी उद्धव ठाकरेंची बाजू मांडतील. ॲडव्होकेट रवीशंकर जंध्याल उपाध्यक्षांची बाजू मांडणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
 
एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात धाव


 शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे कॅम्पला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी यांच्या नियुक्तीलाही याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. तसेच, शिंदे कॅम्पच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.  यावर आज सुनावणी होणार आहे.  न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. तर, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी उद्धव ठाकरेंची बाजू मांडतील. ॲडव्होकेट रवीशंकर जंध्याल उपाध्यक्षांची बाजू मांडणार आहेत.


आज संध्याकाळपर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता


आज संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 16 आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, या आमदारांनी त्यांची बाजू न मांडल्यास त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. शिवसेनेनं या बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालावर ही पुढची कारवाई अवलंबून असेल. 
 
एकनाथ शिंदेंचं संजय राऊतांना ट्वीटद्वारे उत्तर


हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू. मुंबई बाम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलंय. राऊतांनी या आमदारांबाबत काल केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंनी ट्विटनं राऊतांना टॅग करुन उत्तर दिलंय. 


 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात हाय अलर्ट जारी


 मुंबई आणि एमएमआरडीए भागात विशेष सूचना देण्याचे गृहखात्यानं आदेश दिलेत. राज्यातील राजकीय पेचप्रसंगामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृह खात्यानं सूचना दिल्या आहेत. बंडखोर आमदारांबाबत आणखी नाराजी वाढण्याची शक्यता लक्षात घेत गृह खात्याकडून आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, राज्यपालांनी डीजीपींना लिहिलेल्या पत्रावर आज पोलिसांकडून उत्तर दिलं जाणार आहे. 


राज्यातील बंडाचे परिणाम मनपा निवडणुकीवरही होणार


निवडणुकीच्या राजकारणावर ही परिणाम जाणवणार आहेत. गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेची मनपावर आलेली सत्ता पुन्हा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गेली चाळीस वर्ष सेनेचे नेते सुरेश जैन यांच्या गटाची जळगाव मनपा वर सत्ता होती. मात्र गिरीश महाजन पालकमंत्री असताना त्यांनी मनपावर भाजपची एक हाती सत्ता आणली होती. मात्र राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपाचे 30 नगरसेवक सेनेला जाऊन मिळाल्याने, भाजपाची सत्ता जाऊन पुन्हा सेनेची एकहाती सत्ता आली आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपासोबत सरकार आले तर, या भीतीने सेनेच्या गटात भीतीचे वातावरण आहे. 
 
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनं, सभा, बैठका 
 
 उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी समर्थन रॅली काढण्यात येणार आहे. बुलढाणा,  अमरावती, शिर्डी, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
 आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा अर्ज दाखल करणार


 विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दुपारी 12.15  वाजता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या उपस्थितीत यशवंत सिन्हांची पत्रकार परिषद होणार आहे.


 देशभरात विविध ठिकाणी अग्नीपत योजनेविरोधात काँग्रेसकडून आंदोलन
 
 देशभरात विविध ठिकाणी अग्नीपत योजनेला विरोध म्हणून काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.