राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..


दहावीचा निकाल घसरला, राज्याचा निकाल 93.83 टक्के, नागपूरचा निकाल सर्वात कमी


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली. वाचा सविस्तर


मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा


मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ओळखला जाणार आहे. आज रायगड शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. किल्ले रागडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासोबतच प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. वाचा सविस्तर


नाथांच्या वारीसाठी थेट पंढरपूरपर्यंत मिळणार शुद्ध पाणी, प्रशासनाकडून पाच टँकरची सुविधा 


श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथून आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे टँकर पुरवण्यात येणार असून पायी वारीत सहभागी झालेल्या हजारो वारकरी बांधवांना त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूर (Pandharpur) पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा (Water Supply) होणार आहे. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटची सुविधा देखील करण्यात आली असून हे टॉयलेट्स देखील पंढरपूरपर्यंत उपलब्ध असणार असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर


जळगावात स्टेट बँकेच्या दरोड्यात 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटींचं सोनं लुटले


जळगावात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत काल (1 जून) भरदिवसा दरोडा पडला. हेल्मेटधारी दोन दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकावर हल्ला करुन बँकेतील 17 लाख रुपयांची रोख रकमेसह तीन कोटी रुपयांचे सोनंही लुटून नेलं. इतकंच नाही तर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. वाचा सविस्तर


कुठे वसुली सुरु, तर कुठे कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्याने टोल बंद; समृद्धीचा प्रवास ठरतोय डोकेदुखी


गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे हा महामार्ग सतत चर्चेत पाहायला मिळत आहे. आधी अपघात, त्यानंतर महामार्गावरील पोलिसांची वसुली आणि आता कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने वेळोवेळी टोल बंद होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने टोल नाका बंद पाडल्याचे समोर आले. तर गुरुवारी (1 जून) रात्री देखील असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगावाच्या टोल प्लाझावर पाहायला मिळाले. वाचा सविस्तर