PM Modi Speech: संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार (Chhatrapati Shivaji Maharaj) आज 350 वा राज्याभिषेक दिन आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले आहे. सुरुवातीला त्यांनी या दिवासाचे महत्त्व स्पष्ट करत शिवाजी महाराजांना नमन केले आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी फार भाग्याचा दिवस असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, 'शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणली. शिवाजी महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता सर्वोतोपरी ठेवली. त्यामुळे आज एक भारत-श्रेष्ठ भारत या योजनेमध्ये शिवाजी महारांच्या विचारांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल.' 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, "छत्रपती शिवाजी महारांचा राज्याभिषेक दिन हा नवी चेतना आणि नवी उर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महारांचा राज्याभिषेक सोहळा हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष सोहळा आहे. राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचे मूळ तत्व होते."  


शिवाजी महाराजांनी आत्मविश्वास निर्माण केला : पंतप्रधान मोदी


पंतप्रधानांनी म्हटले की, "शेकडो वर्षांपूर्वी गुलामगिरीने आणि आक्रमणांनी देशातील लोकांचा आत्मविश्वास हिसकावून घेतला होता. शत्रूच्या शोषणाने आणि गरिबीने समाजाला कमकुवत केले होते. आपल्या सांस्कृतिक स्थळांवर हल्ला करुन लोकांचे खच्चीकरण केले होते. परंतु त्यावेळी जनतेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे कठीण कार्य शिवाजी महाराजांनी त्या काळात केले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचा सामना केलाच पण त्यांनी स्वराज्यस्थापनेचा विश्वास देखील जनतेमध्ये निर्माण केला. त्यांनी लोकांना राष्ट्रनिर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले."  


'शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत'


पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, "या देशात अनेक शासक होऊन गेले परंतु त्यांचे शासन कमकुवत होतं. परंतु शिवाजी महारांजाचे व्यक्तिमत्त्व अद्भुत आहे. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सुराज्याचे देखील घडवले. त्यांनी त्यांच्या शौर्याने आणि सुशासाने त्यांचा नावलौकिक मिळवला आहे. एक राजा म्हणून त्यांनी लोकांच्या मनात सुराज्याचे विचार निर्माण करुन सुशासन निर्माण केले. त्यांच्या विचारांमुळे ते इतिहासातील इतर राज्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांनी लोकांना आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्यामुळे शेतकरी विकास, महिला सशक्तीकरण यांसारख्या गोष्टींना त्यांनी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत जे कोणत्यातरी रुपामध्ये ते आपल्या जीवनमध्ये प्रभाव निर्माण करण्यास प्रोत्साहन देतात."