मुंबई : राज्यात कोरानानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच राज्यात आजही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात गेल्या 24 तासांत 13 हजार 659 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 


राज्यात आज 13659 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून आज 9 हजार 913 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 20 लाख 99 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण 99 हजार 008 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21 टक्क्यांवर आलं आहे. 


पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 2 हजार 515 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.


औरंगाबाद शहरामध्ये आजपासून अशंतः लॉकडाऊनला सुरुवात


औरंगाबाद शहरामध्ये आजपासून अशंतः लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे 4 एप्रिलपर्यंत या अशंतः लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पूर्णतः तयारी केलीय. मास्क न वापरणे आणि लॉकडाऊनच्या काळातील नियम पाळले नाही तर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसाला 550 पर्यंत पोहचली आहे. त्यात ट्रेसिंग आणि टेस्टींग वेळेत होत नसल्यानं  कोरोना रुग्णांचे निदान लवकर होत नाही, त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळेच उद्यापासून औरंगाबाद शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.  


वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवलीत कठोर निर्बंध लागू


कल्याण डोंबिवलीमध्ये बुधवारी कोरोना रूग्णसंख्येचा नवा आकडा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली. बुधवारी कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 392 इतक्या  नव्या कोरोना रुग्णसंख्येने संपूर्ण प्रशासन हडबडून गेलं. ऑक्टोबर 2020 म्हणजेच 5 महिन्यांनंतर  इथल्या कोविड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :