Lokmanya Tilak Death Anniversary 2022 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार होते. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी.  या निमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास. 


लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीस झाला. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत आणि आई पार्वतीबाई. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना 'बाळ' या टोपणनावानेच ओळखायचे. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती.


"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. कारण स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जन-नेते होते. 


विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. 



भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरु केली. त्यानुसार 1894 साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली.  


वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्‍या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता आणि आचार्यांची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत. 


महत्वाच्या बातम्या :