कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील कापशी या गावात एका चिमुकल्याची हत्या करून मृतदेह घराशेजारी टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरव केसरे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव असून त्याच वय 6 वर्षे आहे. रविवारी संध्याकाळपासून आरव बेपत्ता होता. घरातील नागरिक आणि गावकऱ्यांनी दोन दिवस शोधाशोध केली, पण आरवचा शोध काही लागला नाही. आज पहाटे आरवचा मृतदेह केसरे यांच्या घराशेजारी आढळून आलाय. 


मृतदेहावर कुंकू आणि गुलाल टाकल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा भागात सुरु झाली आहे. कोल्हापूर पोलीस या हत्येचा तपास करत आहेत. मात्र जोपर्यंत हत्येची स्पष्टता होत नाही तोपर्यंत काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय. आरवची हत्या ज्याने केली आहे त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केलीय.


कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाची दीड महिन्यांपूर्वी हत्या केली झाली आहे. या प्रकरणाला दीड महिना होऊनही त्याच्या हत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. ही घटना ताजी असतानाच शाहुवाडी तालुक्यात आणखी एका बालकाच्या हत्येने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.


या अमानुष आणि क्रूर घटनेमुळे शाहुवाडी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी मारेकर्‍यांचा तातडीने छडा लावून त्याला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.


दरम्यान, शाहुवाडी तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


 



महत्वाच्या बातम्या :