मुंबई : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे.


नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.


...तर लोकल सेवा बंद करावी लागेल


मुंबई, पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. लोकं कामानिमित्त बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लोकं बाहेर पडणार नाहीत यासाठी, काही सेवा बंद करण्यावर सरकारने भर दिला. गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल सेवा बंद करावीच लागेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टेस्टिंग लॅब्स वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्य सरकार मेडिकल कॉलेजमध्येही लॅब्स उभारण्यास तयार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना याबाबत विनंती केली आहे. राज्यात लॅब्स वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.


राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी




  • पिंपरी चिंचवड मनपा - 12

  • पुणे मनपा - 10

  • मुंबई - 21

  • नागपूर- 4

  • यवतमाळ - 3

  • नवी मुंबई - 3

  • कल्याण - 3

  • अहमदनगर - 2

  • रायगड - 1

  • ठाणे - 1

  • उल्हासनगर - 1

  • औरंगाबाद - 1

  • रत्नागिरी - 1


कोरोनामुळे देशात चौघांचा मृत्यू


कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याआधी 13 मार्चला कर्नाटकातील कुलबुर्गी येथे 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, ही व्यक्ती सौदी अरब येथून परतली होती. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग दिल्लीतील 68 वर्षीय महिलेला झाला होता. तिचा 17 मार्च रोजी मृत्यू झाला. तर 19 मार्चला पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.


संबंधित बातम्या :