मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच औरंगाबाद, ठाणे, बीडसह अन्य काही जिल्हे उद्या बंद राहणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी आणि खासगी दुकाने, आस्थापने बंद राहणार आहेत. या सर्व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तर नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Coronavirus | कोरोना प्रतिबंधक उपचाराचा 'गोल्डन अवर' सुरू, यंत्रणांनी सतर्क रहावे : मुख्यमंत्री

21 आणि 22 मार्चला बीड बंद 
कोरोना विषाणुचा संसर्ग (कोव्हीड-19) रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सर्व उपविभागीय अधिकारी, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, सर्व तहसीलदार, सर्व संबंधीत नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इ.ची असणार आहे. ह्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Coronavirus | मुंबईतली कॉरंटाईन क्षमता संपली, आता विमानतळावरुनच प्रवाशांची मुंबईबाहेर रवानगी
नागपूरमध्ये लॉकडाउन
कोरोना व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी काही निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना काही अधिकार दिले आहेत त्या नुसार. शहरात नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडायचे आहे. सर्व खासगी कार्यालय बंद करायचे आहेत. फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. यात भाजीपाला, दूध, औषधी, पाणी, फूड होम डिलिव्हरी सुरू राहतील. नियम तोडल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. 1897 हा कायदा शहरात लागू झाला असून नागपुरात शहरात लोक डाऊन आहे.

ठाणे अत्यावश्यक सेवा वगळून पूर्णपणे बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना अत्यावश्यक किराणा सामान ( GROCERY), दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय (CHEMIST SHOP) वगळून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये होम कॉरंटाईनचे उल्लंघन; तरुणाचा कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क

औरंगाबाद शहर दोन दिवस बंद
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता, औरंगाबाद शहर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतला आहे. उद्या आणि परवा संपूर्ण शहर बंद राहील त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील उदय चौधरी यांनी केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांना या बंदमधून सूट देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

Coronavirus | Ajit Pawar PC | आवाहन करुनही गर्दी कमी न झाल्यास सार्वजनिक वाहतूक बंद करणार:अजित पवार