एक्स्प्लोर
मुख्यमंत्री मराठवाड्यातील दुष्काळाचा औरंगाबादेत आढावा घेणार
औरंगाबादेत बुधवारी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. विभागीय आयुक्त आणि आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला हजर राहतील. गृहमंत्री म्हणून यावेळी ते गुन्ह्यांबाबतचाही आढावा बैठकीत घेण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत आढावा बैठक घेणार आहेत. मराठवाड्यात या वर्षी सरासरीच्या 62 टक्के पाऊस पडलाय. त्यात खरीपाचा हंगाम पूर्णतः वाया गेलाय. पाणीसाठ्याचीही भीषण अवस्था आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील तीन हजार गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. काय आहे मराठवाड्यातल्या दुष्काळाची परिस्थिती? सरकारी आकडेवारीनुसार, मराठवाड्यात तीन हजार गावांवर दुष्काळाचं सावट आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. खरीप हंगामाची पैसैवारी जाहीर झाली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. नजर अंदाजाने काढलेल्या आणेवारीत मराठवाड्यातील 8 हजार 533 गावांपैकी तब्बल 2 हजार 958 गावांची पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. म्हणजे ही सगळी गावं दुष्काळाच्या भीषण सावटाखाली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. कशी आहे मराठवाड्यातील आणेवारी? औरंगाबाद जिल्ह्यातील 1355 गावांपैकी 1335 गावांची पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. जालन्यातील 971 गावांपैकी 952 गावांची पैसैवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. बीडमधील एकूण 1402 गावांपैकी 671 गावांती पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. यामुळे मराठवाड्यातील पैसैवारीचा हा अहवाल मदत व पुनर्वसन खात्याला मराठवाडा विभागीय आयुक्तांकडून पाठवण्यात आलाय. मराठवाड्यातील पिकांची परिस्थिती पावसाअभावी नगदी पीक मूग आणि उडीद हातातून गेलं आहे. सोयाबिन, कापूसही हातचा गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद, बीड आणि जालनामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 53.29 टक्के, जालन्यात 61 टक्के तर बीडमध्ये 50 टक्के इतका पाऊस झाला आहे. संपूर्ण मराठवाड्यातच वार्षिक सरासरीच्या फक्त 64 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील पेरणी मराठवाड्यात एकूण 50 लाख चार हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी 48.61 लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला होता. सध्या मूग आणि उडीद पिकांची काढणी सुरु आहे. त्यात 10 ते 50 टक्के घट येत आहे. मकाच्या उत्पादनातही 40 टक्के घट अपेक्षित आहे. सोयाबिनसुद्धा 35 ते 50 टक्क्यांपर्यंत घटणार आहे.
आणखी वाचा























