Devendra Fadnavis : स्वबळावर की महायुतीतून? भाजपच्या जिल्हाध्यक्षाला निर्णयाचा अधिकार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Mumbai BJP Meeting : आपण महायुतीत आहोत याचं भान ठेऊन लढावं, मित्र पक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार असून जिल्हाध्यक्षांना त्याचे अधिकार असतील असं भाजपकडून (Mumbai BJP Meeting) स्पष्ट करण्यात आलं आहे. पण असं करताना महायुतीतील मित्र पक्षांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मुंबईत कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत लढायच्या, हा निर्णय जिल्हा पातळीवर ठेवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांवर निवडणूक लढण्याचा निर्णय सोपवण्यात आला आहे. पण असं करताना आपण महायुतीत आहोत याचे भान ठेऊन लढावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
Mumbai BJP Meeting : नव्यांचा प्रवेश करून घ्या
आपण जर वेगवेगळं लढलो तरी महायुतीतील मित्र पक्षांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. नव्या लोकांचा प्रवेश करून घ्या, प्रवेश करून घेताना जुन्या लोकांनी त्यांना स्वीकारावे आणि संघटना वाढवावी असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं.
आपण महायुतीतत आहोत याचं भान ठेवा आणि टीका करा असा सल्लाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना हा सल्ला दिल्याची चर्चा आहे.
Devendra Fadnavis : महायुतीतूनच लढावं लागेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्या अॅक्शन मोडवर आहेत. सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी कार्यकर्त्यांचा मूड चाचपणं सुरु आहे. एक वेळ शिंदे चालतील पण अजितदादांसोबत जाणं नको अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र काहीही झालं तरी महायुतीत लढायचं हा संदेश भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे मुख्य नेते देत आहेत.
महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसतंय. पदाधिकाऱ्यांची कितीही इच्छा असली तरी निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्या लागणार आहेत. याची जाणीव तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच स्वबळाची भाषा मोठे नेते सध्यातरी करताना दिसत नाहीत.
ही बातमी वाचा:

















