एक्स्प्लोर
24 तासात दुचाकीवर 2453 किमीचा प्रवास, सांगलीच्या मानसिंगचा विक्रम
या विक्रमाची नोंद गीनिज बूकमध्ये होण्यासाठी छाननी सुरू आहे. हा विक्रम झाला तर देशातील सर्वात वेगवान मोटारसायकलपटू म्हणून मानसिंगला गौरवलं जाईल.

सांगली : 2453 किलोमीटरचं अंतर केवळ 24 तासात पार करण्याचा विश्व विक्रम सांगलीच्या इस्लामपूरमधील बाईक रायडर मानसिंग देसाई याने केला आहे. इस्लामपूर ते कन्याकुमारी आणि परत इस्लामपूर असा प्रवास त्याने केला. या विक्रमाची नोंद गीनिज बूकमध्ये होण्यासाठी छाननी सुरू आहे. हा विक्रम झाला तर देशातील सर्वात वेगवान मोटार सायकलपटू म्हणून मानसिंगला गौरवलं जाईल. मानसिंग देसाई सहकार खात्यात ऑडिटर कार्यरत आहे. सेवेत असतानाच या तरुणाने मोटारसायकलच्या भन्नाट वेगाचा छंद जपलाय. मोटारसायकलची आणि त्याच्या वेगाचे त्यांला लहानपणापासून विलक्षण वेड आहे. या छंदाचा त्याने एक विक्रम करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने आपल्या जमिनीतील काही गुंठे जमीन विकून ट्रायम्फ टायगर ही दूरवरच्या प्रवासायोग्य मोटार सायकल घेतली. काही दिवस सराव केला. सांगलीतील ऐश्वर्या रॉयल रायडर्स क्लबचा सदस्य झाला. इस्लामपूर ते कन्याकुमारी आणि परत इस्लामपूर असा 2453 किमीचा प्रवास 24 तासात पूर्ण करण्याचा विक्रम करण्याचा निर्णय घेतला. इस्लामपूरपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बंगळुरु मार्गे कन्याकुमारीत 12 तासात पोहोचला. परत त्याच मार्गे 12 तासात तो इस्लामपूरमध्ये दाखल झाला. असा एकूण 24 तासात मानसिंगने तब्बल 2453 किमीचा प्रवास करून एक विक्रम केला. या मार्गात ठिकठिकाणी मानसिंगला पेट्रोल भरण्यासाठी थांबावं लागलं. त्यांच्या मोटारसायकलला जीपीएस यंत्रणा बसवली होती आणि त्याचा आयडी त्यांनी 1500 जणांना दिला होता. त्यामुळे तो कुठे आहे, हे इतरांनाही कळू शकत होतं. हा सारा प्रवास राष्ट्रीय महामार्गावरून झाला आणि महामार्गाच्या रस्त्याची स्थिती चांगली असल्याने ताशी वेग 105 ते 110 ठेवता आला. यामध्ये केवळ एनर्जी ड्रिंक घेत आपण प्रवास केल्याचे मानसिंग सांगतो. आतापर्यंत 150 जणांनी अशा पद्धतीने बाईक राईड करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ते अपयशी ठरलेत. याआधी 24 तासात 23 हजार किमीपर्यंत प्रवास केल्याचा रेकॉर्ड आहे. मात्र मानसिंगने इस्लामपूर-कन्याकुमारी ते इस्लामपूर हा प्रवास 24 तासात करत जुने रेकॉर्ड मोडले. आता याची वर्ल्ड रेकॉर्डसाठी छाननी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















