![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur News : सीमाभागात प्रत्येक वर्षी शिवजयंतीला रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार; उद्योग मंत्री उदय सामंताची घोषणा
Kolhapur News : राज्य सरकार, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कागलमध्ये अर्जुननगर येथील (देवचंद कॉलेज) येथे महा-रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
![Kolhapur News : सीमाभागात प्रत्येक वर्षी शिवजयंतीला रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार; उद्योग मंत्री उदय सामंताची घोषणा Minister Uday Samant announcement that maharashtra karnataka border area will organize an employment fair every year Kolhapur News : सीमाभागात प्रत्येक वर्षी शिवजयंतीला रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार; उद्योग मंत्री उदय सामंताची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/20/397a8f17021a4846b3b80d008423b4da1676876004436444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur News : यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमाभागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वाची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली. राज्य सरकार, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कागलमध्ये (Kagal) अर्जुननगर येथील (देवचंद कॉलेज) येथे महा-रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर (Kolhapur News) आदी ठिकाणच्या विविध 92 कंपन्यांनी आपला सहभाग दर्शविला. या मेळाव्याकरिता सुमारे चार हजार उमेदवारांनी आपली नाव नोंदणी केली. यावेळी नोकरीसाठी पात्रता धारण केलेल्या सुमारे 25 युवक-युवतींना नोकरी प्रमाणपत्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध बँकांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरव तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत चार वाहनधारक लाभार्थींना वाहनांची चावी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बारा उमेदवारांना कर्ज मंजुरी पत्रे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी, देवचंद शिक्षण समुहाचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्षा तृप्ती शहा, राहुल पंडित, रविंद्र माने, राजेखान जमादार, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते.
रोजगार निर्मिती कार्यक्रम या भागात सुरु करण्याची गरज
सामंत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या भागात सुरु करण्याची गरज आहे. सीमा भागासाठी ही योजना सुलभ करण्याचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील उद्योगांना ज्या प्रमाणे प्रोत्साहन देतो, त्याप्रमाणे या भागातील लोकांना दिले जाईल. सीमा भागातील नक्की प्रश्न काय आहेत. हे समजून घेण्यासाठी आगामी काही दिवसांत येथे मेळावा घेवून सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शंभुराज देसाई यांना या मेळाव्यासाठी आपण घेवून येवू. त्याचबरोबर सीमा वादावर जे-जे करावे लागेल ते-ते राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण करु, अशा नि:संदिग्ध शब्दात त्यांनी यावेळी ग्वाही दिली.
सीमा भागातील युवक-युवतींनी आपल्यातील कौशल्य आणि शैक्षणिक पात्रता ओळखून त्याप्रमाणे कंपनीची निवड करावी. येथील युवकांनी स्वत:ला एकटे समजू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहील. तसेच ज्या कंपनींनी गरजू उमेदवारांची नियुक्ती केली आहे, अशा उमेदवारांना त्या-त्या कंपन्यांनी सन्मानजनक वेतन द्यावे, अशी अपेक्षाही उद्योग मंत्री सामंत यांनी व्यक्त केली.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, सीमा भागातील युवक-युवतींसाठी प्रथमच रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्याला युवक-युवतींनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. ही बाब अभिमानास्पद असून या मेळाव्यातून केवळ नोकरी मागणारेच युवक निर्माण न होता अनेक उद्योजक निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, विद्यार्थ्यांनी ‘हार्डवर्क’ला प्राधान्य द्यावे. स्पर्धात्मक युगात स्वत:ला स्पर्धेसाठी तयार ठेवावे. केवळ नोकरीवरच समाधान न मानता रोजगाराच्या अधिक संधी त्यांनी शोधाव्यात. ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली नाही अशा उमेदवारांनी निराश होवू नये. कौशल्य ओळखून त्यांनी स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
सीमावासियांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी या महा-रोजगार मेळाव्याप्रमाणेच लवकरात-लवकर मेळावा आयोजित करावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी यावेळी व्यक्त केली. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय (कागल), एमआयडीसी, परिवहन, जिल्हा उद्योग केंद्राचे सतीश शेळके, जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्राचे संजय माळी यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)