Arjun Khotkar: आमदार अर्जुन खोतकरांसमोर दोन गटात तुंबळ हाणामारी; मध्यस्थीसाठी गेलेल्या खोतकरांनीही एकाला चापट माराली, म्हणाले...
Jalna News: ढगफुटीसदृश्य पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आमदार अर्जुन खोतकर यांनी आढावा घेतला. मात्र या भेटी दरम्यान आमदार खोतकरांच्या समोरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडलीय.

Jalna News : राज्यभरात सध्या पावसाचा जोर वाढला असून या पावसाचा फटका जालना शहराला देखील बसला आहे. जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून अनेकांच या पावसाने मोठं नुकसान केलं आहे. अशातच या ढगफुटीसदृश्य पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी सोमवारी जालन्यातील बाधित भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र या भेटी दरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडलीय. आमदार अर्जुन खोतकरांच्या समोरच दोन गटांमध्ये हि हाणामारी झाली आहे.
एकाला हटवण्यासाठी चापट मारावी लागली- अर्जुन खोतकर
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून सध्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. अशातच शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सोमवारी शहरात पाहणी दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यादरम्यान जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. यात पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्यामुळे आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटांमध्ये मारामारी झाली. यावेळी खोतकर यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाची समजूत काढली. मात्र दोन्ही गटाकडून कुणीही ऐकायला तयार नसल्याने वाद मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये अर्जुन खोतकर यांनी एकाला चापट मारल्याचे ही पाहायला मिळाले. तर जमावाला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यात एकाला हटवण्यासाठी चापट मारावी लागली, असे स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणावर दिली आहे.
मुसळधार पावसाचा मोसंबी बागांना फटका, बागांना तलावाचं स्वरूप
जालना जिल्ह्यात काल मध्यरात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका खरिपातील सोयाबीन, कपाशीसह फळबागांना देखील बसला आहे. जालन्यातील खनेपुरी परिसरातील मोसंबी भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोसंबी उत्पादक हवालदिल झाला आहे. खनेपुरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबी बागांना तलावाचं स्वरूप आला आहे. जालना शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झुडपून काढलं, यामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले असून, अनेकांना रात्रभर जागे राहून त्यांना घराबाहेरच आश्रय घ्यावा लागला. सर्व अन्यधान्य आणि संसारउपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. शहरातील साठे नगर भागात अनेकांना रस्त्यावर रात्र जागून काढावी लागली.
महत्वाच्या बातम्या:
























