Coronavirus Cases India केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांसह 24 वी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबेही उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली. ज्यामध्ये त्यांनी कोरोना रुग्णांची आकडेवारीही सादर केली. 


देशात आतापर्यंत 1 करोड़ 19 लाख 13 हजार 292 नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचलेलं असतानाच आता ही आकडेवारी 91.22 टक्क्यांवर पोहोचली आहे. 149 जिल्ह्यांमध्ये मागील 7 दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. तर, 8 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांपासून एकाही रुग्णाची नोंद नाही. असे तीन आणखी जिल्हेही आहेत तिथे 21 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती हर्षवर्धन यांनी दिली. 


Corona vaccination | जाणून घ्या कोणत्या राज्याला किती कोरोना लसींचा पुरवठा, कोणत्या राज्यात आहे लसींचा तुटवडा


देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा याबातही परिस्थिती काहीशी तणावपूर्ण असतानाच त्यांनी यासंदर्भातील आकडेवारीही सादर केली. सध्याच्या घडीला देशात 0.46 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 2.31 टक्के रुग्ण आयसीउयमध्ये आहेत. तर, 4.51 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. 


देशातील कोरोना परिस्थिती नेमकी कोणत्या वळणावर आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले 'देशातील कोरोना मृत्यूदर हा सातत्यानं कमी होत आहे. त्यातच आरोग्य विभागात काम करणाऱ्या जवळपास 89 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 54 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.'


"लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय", जावडेकरांच्या आरोपांवर राजेश टोपेंचं उत्तर


लसींचा कमी पुरवठा होत असल्याची बाब आरोग्यमंत्र्यांनी फेटाळली 


महाराष्ट्रात फक्त 14 लाख कोरोना लसीच शिल्लक असल्याचा राज्य शासनाचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावला. कोरोना या वैश्विक महामारीला नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारकडून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. लसींच्या पुरवठ्याबाबत राज्यांना यासंदर्बातील माहिती वेळोवेळी दिली जात असल्याचंही ते म्हणाले. 


परिपत्रकाद्वारेही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची टीका 


केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एक परिपत्रक ट्विट करत त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर टीका केली होती. राज्याती कोविड व्यवस्थापनाबाबत लिहीत त्यांनी नाराजीचा सूर आळवला होता. 'गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करुन दिली. केंद्रीय चमू पाठविल्या. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले, याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत'.