बेळगाव : देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला होणार आहे. संपूर्ण भारताचे या दिवसाकडे लक्ष लागले आहे. परंतु हा भूमीपूजनाचा मुहूर्त बेळगाव येथील पंडितांनी काढून दिला आहे.


बेळगावच्या श्री राघवेंद्र स्वामी नव वृंदावनचे प्रमुख पंडित एन.आर.विजयेन्द्र शर्मा यांनी राम मंदिराच्या भूमी पूजनाचा मुहूर्त काढून दिला आहे.अयोध्येतील राम मंदिराचे ट्रस्टी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधून राममंदिर भूमीपूजनासाठी शुभ मुहूर्त काढून देण्यास सांगितले होते. त्यानुसार शर्मा यांनी त्यांना चार शुभ मुहूर्त पाठवले होते. 29 जुलै सकाळी नऊनंतर, 31 जुलै सकाळी सात ते नऊ दरम्यान, 3 ऑगस्टला सकाळी दहानंतर आणि 5ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असे ते चार मुहूर्त होते. त्यापैकी पाच ऑगस्टचा मुहूर्त राम मंदिर भूमीपूजनासाठी निश्चित करण्यात आला आहे. 15 जूनला हे चार मुहूर्त स्वतः पत्र लिहून शर्मा यांनी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना कळवले होते.


भूमिपूजन 5 ऑगस्टलाच का?-  पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण


राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन 5 ऑगस्टला करण्यात येणार आहे. संपूर्ण भारताचे का दिवसाकडे लक्ष लागले आहे. मात्र त्यासाठी 5 ऑगस्ट हाच दिवस का निश्चित करण्यात आला. त्याला देखील कारण आहे. वास्तुशास्त्रानुसार हा शुभ मुहूर्त असल्याचे पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. तसेच या दिवसाला पौराणिक आणि आधुनिक भारताच्या इतिहासात देखील महत्व आहे. राम मंदिर निर्माण हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा विषय असल्याचे सोमण म्हणाले.


संबंधित बातम्या :