एक्स्प्लोर
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

इंफाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. इतर पक्षांचा पाठिंबा मिळत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर इबोबी सिंह यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर इबोबी सिंह यांनी बहुमत असल्याचा दावा करत राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच राजीनामा देण्याची घोषणा केली. इबोबी सिंह यांनी राजीनामा दिल्याशिवाय नवीन सरकार स्थापनेची पुढील प्रक्रिया केली जाऊ शकत नाही. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या भेटीदरम्यान इबोबी सिंह यांनी काँग्रेसच्या 28 आमदारांची यादी सादर करत सरकार स्थापनेचा दावा केला होता. शिवाय नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) च्या चार आमदारांचा पाठिंबा असल्याचाही दावा केला. मात्र एनपीपीने आपला काँग्रेसाला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानतंर इबोबी सिंह यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. भाजपचा सरकार स्थापनेचा दावा भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून राज्यपालांसमोर बहुमताचा आकडा सादर केला आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बिरेन सिंह यांनी पाठिंबा देणाऱ्या सदस्यांसह राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांची भेट घेतली. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला. 60 आमदार असलेल्या मणिपूर विधानसभेसाठी 31 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपने आपलं संख्याबळ 32 असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. शिवाय भाजपने मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारी जाहीर केला आहे. नाँगथाँबम बिरेन सिंह हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती मणिपूरचे केंद्रीय निरीक्षक विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
संबंधित बातमी : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















