Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
Bihar BJP : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यसभा खासदार झाले आहेत. त्यामुळं आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाटणा : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा बिहार चर्चेत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यसभा खासदार होत पुन्हा नवी दिल्लीत राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत आहेत. त्यामुळं बिहारमध्ये भाजपला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरु आहेत. बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात तयारी जोरदार सुरु आहे . बिहारमधील सत्ताधारी जदयू आणि भाजपनं मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
एनडीएकडून देखील आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा मंगळवारी राजीनामा देतील अशी शक्यता आहे. यामुळं नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात दिल्लीपासून पाटणा पर्यंत घडामोडी वाढल्या आहेत.
बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांनी मंगळवारी दुपारी पक्ष कार्यालयात भाजप आमदारांची बैठक होणार असल्याचं सांगितलं. यानंतर सायंकाळी 4 वाजता एनडीएच्या आमदारांची बैठक होईल. जी विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये होईल, असं त्यांनी सांगितलं. या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शिवराज सिंह उपस्थित असतील.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता अखेरची कॅबिनेट बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते राजीनामा देण्यासंदर्भात औपचारिक घोषणा करु शकतात. त्यानंतर नितीश कुमार राजीनामा राज्यपालांकडून सोपवतील. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ पदावर राहिले आहेत. नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांचे समर्थक आणि पार्टीचे कार्यकर्ते हैराण झाले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं होतं. बिहारच्या 243 जागांपैकी एनडीएनं 202 जागांवर विजय मिळवला होता. यात भाजपनं 89, जदयूनं 85 जागा जिंकल्या. लोजपा रामविलास पक्षानं 19 जागांवर विजय मिळवला. हिंदुस्तानी अवाम मोर्चाला 5 आणि रालोमो पक्षाला चार जागांवर विजय मिळवला.
भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार?
भाजप बिहारचं मुख्यमंत्रिपद कोणाला देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचं नाव आघाडीवर आहे. चौधरींकडे गृहमंत्रालय आहे. मात्र, त्यांची पार्श्वभूमी संघाची नसल्याचं देखील बोललं जातंय. राजद आणि जदयूमध्ये देखील ते होते. याशिवाय केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांचं नाव चर्चेत आहे. 1980 च्या दशकात ते राम जन्मभूमि आंदोलनात अभापिवचे कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले होते.2019 मध्ये केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष होते. भाजपमधून ऐनवेळी वेगळंच नाव देखील समोर येण्याची शक्यता आहे. भाजपकडून बिहारमध्ये ओबीसी नेतृत्वाला देखील संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत.





















