Amit Shah On Opration Sindhoor: 22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताच ठोकलं; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कसं घेरलं?, अमित शाहांनी सगळं सांगितलं!
Amit Shah On Opration Sindhoor: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा करण्यात आला. तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याचा पुनरुच्चार अमित शाह यांनी केला.

Amit Shah On Opration Sindhoor नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला (Pahalgam Terror Attack) करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी याबाबत आज (29 जुलै) लोकसभेत माहिती दिली. तसेच मारण्यात आलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याचा पुनरुच्चार देखील अमित शाह यांनी केला.
अमित शाह म्हणाले की, 'ऑपरेशन महादेव'मध्ये, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. सुलेमान हा लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. आपल्या गुप्तचर यंत्रणेकडे पहलगाम हल्ला आणि गगनगीर दहशतवादी हल्ल्यात सुलेमानचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे आहेत. यासोबतच, अफगाण हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता आणि जिब्रान देखील एक दहशतवादी होता.
In Lok Sabha, Union Home Minister Amit Shah says, " All three terrorists - Suleman, Afghan and Jibran were killed in yesterday's operation. The people who used to supply food to them were detained earlier. Once the bodies of these terrorists were brought to Srinagar, they were… https://t.co/jBP4SmmbUJ pic.twitter.com/pK48Lp7MIP
— ANI (@ANI) July 29, 2025
22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताचं ठोकलं-
दाचिगाम परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळविण्यासाठी 22 मे ते 22 जुलै 2025 पर्यंत आयबी आणि लष्कराकडून सतत प्रयत्न केले गेले. थंड उंचावर सैन्याचे अधिकारी असायचे. सिग्नल इंटरसेप्ट करण्यासाठी कधी पायी चालत फिरायचे. त्यानंतर 22 जुलै रोजी लष्कराला यश मिळाले आणि सेन्सर्सच्या मदतीने दहशतवादी त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. सेन्सरच्या माध्यमातून दहशतवादी असल्याची पुष्टी झाली. देशातील लष्कर आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरण्यासाठी एकत्र काम केले आणि ऑपरेशन महादेवमध्ये तिन्ही दहशतवादी मारले गेले.
1055 लोकांची 3000 तासांहून अधिक चौकशी-
पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही तातडीने एनआयएकडे तपास सोपवला. तपासाला बराच वेळ लागला. तपासादरम्यान, मृतांच्या नातेवाईकांशी बोलण्यात आले. पर्यटक, छायाचित्रकार, कर्मचारी, विविध दुकानांमधील कामगार अशा 1055 लोकांची 3000 तासांहून अधिक चौकशी आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. नंतर, या आधारे एक स्केच तयार करण्यात आला. बरीच शोधाशोध केल्यानंतर, 22 जून 2025 रोजी बशीर आणि परवेझ यांची ओळख पटली, ज्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख कशी पटवली?
दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. याच तीन दहशवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींनीही त्यांची ओळख पटवली आहे. आज (29 जुलै) पहाटे 4 वाजता दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना देखील अटक करण्यात आली आहे.
22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत झाला होता हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. पहलगामपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी लोकांची धार्मिक ओळख विचारून पर्यटकांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते.

























