Nagpur : 'या' कारणांमुळे वाढते समाजात विषमता, न्या. जयदीप पांडे यांनी सांगितले कारण
बालकांचे विविध प्रकारच्या अत्याचार व शोषणापासून संरक्षण कायद्याच्या आधारावरच केले जाते. मुलांच्या विकासावरच देशाचा विकास साधता येतो. असे मार्गदर्शन मान्यवरांनी कार्यक्रमात केले.

नागपूर : आपल्या अधिकारांची जाणीव नसल्याने समाजात विविध प्रकारचे भेदभाव निर्माण होतात. आपल्या अधिकार आणि कायद्याची जाणीव असली तर व्यक्ती अन्याय सहन करत नाही. त्याविरोधात पुढाकार घेऊन समोर येतो. त्यामुळे नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती केल्यास हा भेदभाव नष्ट करता येतो, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदीप पांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जी.एस. रायसोनी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रायसोनी कॉलेज येथील विवेकानंद सभागृहात जागतिक समाजिक न्याय दिवस, राज्य व केंद्र शासनाची असलेली विविध सार्वजनिक सेवा व योग्य कामासाठी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि शिक्षणाचा अधिकार व बालकांचे अधिकार या विषयांवर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदीप पांडे, प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र राठी, जी.एस.रायसोनी विधी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक पावडे, प्राचार्य किर्ती राठोड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. न्यायाधीश पांडे लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 यावर माहिती देतांना बालकांचे हित व संरक्षण अधिकाराबाबत उचित तरतूदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत, असे सांगितले. बालकांचे लैंगिक शोषण करणे अपराध आहे. बालकांची काळजी व संरक्षणाबाबत या कायद्यामध्ये तरतूदी केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
ॲङ राजेंद्र राठी यांनी उपस्थितांना सामाजिक न्याय विभागांतर्गत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि शिक्षणाचा अधिकार व बालकांचे अधिकार या विषयी माहिती दिली. बालकांचे विविध प्रकारच्या अत्याचार व शोषणापासून संरक्षण कायद्याच्या आधारावरच केले जाते. मुलांच्या विकासावरच देशाचा विकास साधता येतो. तसेच भारतीय राज्य घटनेतील मुलांशी संबंधित तरतुदी व योजनेचे मुख्य उद्देश ठेवून बालकांचे मुलभूत हक्क आणि लाभ यांची रुपरेषा आखणे, देखभाल व संरक्षणाची गरज असलेली मुले तसेच विधी संघर्षग्रस्त बालके यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना खात्रीशीररित्या कायदेतज्ञांनी मदत उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात अशोक पावडे यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाचे उद्देश सांगून सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य किर्ती राठोड यांनी केले. या कार्यक्रमास 70 विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















