धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात वाघाचा मुक्त संचार, वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
बार्शी अभयारण्य धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्याला लागूनच असल्याने या भागात वाघ सहजपणे फिरत आहे

Dharashiv: यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला एक वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अभयारण्य क्षेत्रात कॅमेरात कैद झाला आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाघ पाणवठ्यावर आला असताना त्याचे दृश्य वन विभागाच्या कॅमेऱ्यात नोंदवले गेले. या घटनेमुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जंगल भागात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बार्शी अभयारण्य धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्याला लागूनच असल्याने या भागात वाघ सहजपणे फिरत आहे. दोन्ही अभयारण्य जवळ असल्याने वाघाच्या मुक्त संचाराला ही जागा अनुकूल ठरत आहे. वन विभागाचे पथक सध्या वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवत आहे.
नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
वन विभागाने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “वाघ दिसल्यास त्वरित माहिती द्यावी, पण त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी,” असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात वाघाचं दर्शन झालं. वनविभागाने बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्ये वाघाची छबी कैद झाली. मराठवाड्यातील धाराशिवमध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान हा वाघ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळहून धाराशिवमध्ये आल्याची माहिती आहे. कॅमेरात कैद झालेला वाघ साधारण तीन वर्षाचा असून हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्याची T22 वाघिणीचा कब असल्याचं सांगितलं जात आहे.
यवतमाळ ते धाराशिव साधारणतः पाचशे किलोमीटरचा वाघाचा प्रवास
धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात या वाघाचा वावर असल्याचं दिसून आलं. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकारी वाघाच्या शोधात आहेत. वाघाच्या पायाचे ठसे ट्रॅप कॅमेऱ्यातली चित्र यावरून वाघ कुठला दिशेने मार्गक्रमण करतोय याचा शोध घेतला जातोय. वाघ आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असला तरी तो विदर्भातील टिपेश्वर येथून आला. यवतमाळ आणि धाराशिव याचे अंतर पाहिलं तर साधारणता पाचशे किलोमीटरचा हा प्रवास आहे. त्यामध्ये जंगलाचा भाग कमी आहे. त्यामुळे सहाजिकच प्रश्न पडतोय वाघानं हा प्रवास कसा पूर्ण केला आणि त्याचा मार्ग कसा असेल, हा प्रश्न या निमित्याने विचराला जाऊ लागला आहे.
यवतमाळचा हा वाघ धाराशिवच्या रामलिंगच्या जंगलात दाखल झाला. मात्र तिथे वातावरण त्याच्यासाठी पोषक आहे का? वनविभाग रामलिंगच्या जंगलातील या वाघाच रेस्क्यू करणार की वाघाच्या सोबतीसाठी वाघीण आणणार? हा प्रश्न होता, त्यावर वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, जिल्ह्यात वाघ दाखल झालाय या माहितीनं नागरिकांमध्येही भीतीच वातावरण आणि अफवा पसरल्या जातात. त्यावर नागरिकांनी एकट्याने फिरू नये, रात्री जाताना सोबत मोठा गाण्यांचा आवाज करत चालावं, अशी खबरदारी घेण्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. धाराशिवच्या जंगलात वाघ आढळला ही जशी सर्वसामान्यसाठी चिंतेची बातमी आहे. मात्र वन्य जीवाचा विचार केला तर ही समाधानाची गोष्ट आहे. रामलिंगच हे अभयारण्य वन्यजीवांसाठी समृद्ध आहे. याचंच हे चित्र आहे. कारण वाघ हा वन्यजीव साखळीतील शेवटचा घटक. हा वाघ आता किती दिवस या जंगलात राहणार माहित नाही, मात्र त्याच्या वास्तव्याच्या काळात मनुष्य आणि वाघ यात संघर्ष होणार नाही त्यासाठी वनविभागाने योग्य पावल उचलणे गरजेचे आहे.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















