सरपंच देशमुख हत्या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडली; क्लीन बोल्ड होण्याची त्यांच्यावर वेळ आली; आमदार सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा
Suresh Dhas on Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडमधील आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) पुन्हा अप्रत्यक्षरीत्या लक्ष केले आहे.

Beed News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडमधील भाजप नेते आणि आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) पुन्हा अप्रत्यक्षरीत्या लक्ष केले आहे. या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. क्लीन बोल्ड झाल्याची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता. असं म्हणत आमदार सुरेश धसांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली होती. त्यावरून देखील धस यांनी टीका केली. जिंदाबाद कुणाला म्हणायचं? याचे भान राहिले पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले.
काही लोक मात्र उगीच छाती फुगवतात- सुरेश धस
राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याला पुढे नेत आहेत. त्यांना सहकार्य आणि साथ देण्याची आवश्यकता आहे. या मतदारसंघाने 79 हजाराची लीड मला दिली. एक लाख 41 हजार मतदारांनी मला मतदान दिले. आणि सर्व रेकॉर्ड तोडण्यात आले. माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. आम्ही आमदार असलो तरी लोकांचे सालकरी म्हणूनच असले पाहिजे. काही लोक मात्र उगीच छाती फुगवतात, असं म्हणत सुरेश धस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत. बीडच्या आष्टी मतदार संघात चिखली ग्रामस्थांनी धस यांची पेढे तुला केली. यावेळी धस यांनी मनसोक्त ढोल बडवला. यादरम्यान आयोजित सभेत सुरेश धस बोलत होते.
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून देशमुख हत्या प्रकरणात हस्तक्षेप - धनंजय देशमुख
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. आरोपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे. बॅनर्स लावणे.. अशा बाबी वारंवार घडत आहेत. लोकप्रतिनिधींनी सामाजिक सलोखा बिघडला असा खोटा आव आणला जात आहे. मात्र देशमुख कुटुंब कुठेही जातिवाद करत नसल्याच म्हणत धनंजय देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे.
लोकप्रतिनिधींनी या विकृतीला सांगण्याची गरज असताना खोट्या वलगणा केल्या जात आहे. आरोपींचे समर्थन करणाऱ्यांचा निषेध करण्याऐवजी त्यांना साधा समज देखील दिला जात नाही. हे म्हणजे अप्रत्यक्ष आरोपीला समर्थन दिल्या सारखं असल्याचं देशमुख म्हणतायेत. अनेकदा आरोपींचे समर्थन करण्यासाठी अजित पवार गटाचे कार्यकर्ते कोर्टात दिसून येतात.. तर आरोपींकडून राबविल्या जात असलेल्या ऑपरेशन डी टू संदर्भात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात तक्रार दिली आहे. धारूर पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर कदाचित देशमुख यांची हत्या घडली नसती. कृष्णा आंधळे बाबतचे उत्तर केवळ पोलिसांकडेच आहे.























