Aurangabad News: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली शिंदे सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी अखेर रविवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिंदे सरकारमध्ये रोहयो मंत्री असलेले संदिपान भुमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे तब्बल 22 वर्षानंतर औरंगाबादकरांना स्थानिक पालकमंत्री मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत भूमरेंच्या निवडीचं स्वागत केलं आहे.


यापूर्वी 1995 मध्ये शिवसेना-भाजप शिवशाही सरकार असताना तत्कालीन आमदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुढे कधीच औरंगाबादला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही. मात्र रविवारी पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आणि भुमरेंना संधी मिळाली. भुमरे यांच्या निमित्ताने तब्बल 22 वर्षांनी औरंगाबादकरांना स्थानिक पालकमंत्री मिळाला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासात आणखी भर पडेल अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे. 


भुमरेंच जल्लोषात स्वागत....


मंत्री संदिपान भुमरे यांना औरंगाबादचे पालकमंत्री पद मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर भुमरे आज औरंगाबादमध्ये येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. शहरात दाखल होणाऱ्या भुमरे यांचं चिकलठाणा भागातील केंब्रिज चौकात भव्य असा सत्कार केलेला जाणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे गटाकडून करण्यात आले आहे.


अब्दुल सत्तारांकडे हिंगोलीची जवाबदारी...


औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी संदिपान भुमरे यांच्या बरोबरच कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. मात्र औरंगाबादची जबाबदारी भुमरे यांच्याकडे देण्यात आली असून, सत्तार यांना हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांना जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी संधी मिळणार असल्याची सुद्धा चर्चा झाली. मात्र जालन्याच्या पालकमंत्रीपदी भाजप आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली आहे.


महत्वाच्या बातम्या... 


एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, नाशिकमध्ये शिंदे सेनेचा पालकमंत्री, महाजनांनावर भुसे भारी 


देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?