Ahmednagar Accident News: औरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील मोहटादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला भरधाव महिंद्रा स्कारपीयो समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ झालेल्या या अपघात चित्तेपिंपळगाव येथील दोन जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अहमदनगर ट्रॅफिक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील चित्तेपिंपळगाव येथील झिंजुर्डे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी आले होते. दरम्यान दर्शन घेऊन झिंजुर्डे कुटुंब परत येत असतानाच रात्री आठ वाजेच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद बारामती राज्य मार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. मारुती अल्टो कारमधून औरंगाबादकडे परतणाऱ्या झिंजुर्डे यांच्या कारला अमरापुर कडून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात अल्टो कारचालक अप्पासाहेब रंगनाथ गावंडे (वय 40 वर्षे, रा. चित्तेपिंपळगाव) आणि गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे (वय 55 वर्षे, रा. चित्तेपिंपळगांव औरंगाबाद)  दोघांचा जागीच मृत्यू झाला. 


अपघातात पाच जण जखमी... 


या अपघातात पाच जण जखमी झाले आहे. ज्यात भक्ती बाबसाहेब झिंजूर्डे (वय 9 वर्षे), माधुरी गणेश झिंजुर्डे (वय 30 वर्षे), अमोल गोरखनाथ झिंजूर्डे (वय 30 वर्षे), गणेश गोरखनाथ झिंजूर्डे (वय 35 वर्षे), तेजेस गणेश झिंजूर्डे (वय दीड वर्ष) हे पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


अपघाताचा जोरदार आवाज...


झिंजुर्डे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवीच्या दर्शनानंतर औरंगाबादकडे परत येत असतानाच, पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर हा भीषण अपघात झाला. प्रचंड वेगाने येणाऱ्या महिंद्रा स्कारपीयोने झिंजुर्डे यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, अपघाताचा जोरदार आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात हलवले. मात्र यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. 


गावात शोकाकुल वातावरण...


चित्तेपिंपळगाव येथील भाविकांचा अहमदनगर येथे झालेल्या अपघात मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताच गावात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. या अपघात मृत्यू झालेले अप्पासाहेब रंगनाथ गावंडे यांच्या घराची नाजूक परिस्थिती आहे. मुलगी लग्नाला आली आहे. अशातच त्यांच्या अपघाती निधनाने गावंडे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


5G in India : भारतात आजपासून 5G चा शुभारंभ, 'या' 13 शहरांमध्ये सुरु होणार सेवा


बाळासाहेबांची सेवा करणारे चंपासिंह थापा आले, आता मिलिंद नार्वेकर देखील येत आहेत! मंत्री गुलाबराव पाटील