Kalki 2898 AD Movie Review : आपण जे पाहिलं नाहीये, तर त्याला उगाचच  क्रिटिसाइज करणं चुकीचं असतं. एकवेळ सिनेमा किंवा नाटक, जे असेल समोर ते, प्रत्यक्षात बघून अनुभवून मग एखाद्या गोष्टीवर आपलं मत व्यक्त करायला हवं, किंवा तसा अधिकार तुम्हाला मिळतो. प्रभास सगळ्यांना भलेही आवडत नसेल, मात्र त्याला ऑफर होणारे सिनेमे हे चांगलेच एक्सपेरिमेंटल आहेत. त्यातच प्रभासच्या नशिबाने सगळेच यशस्वी झाले. सगळ्यांनीच बॉक्स ऑफिस गाजवलं, अश्यातला भाग नाही.


बाहुबली हा सिनेमा सर्वदूर पोहोचला आणि त्यामुळे प्रभासही सर्वदूर पोहोचला. त्यानंतर आलेला साहो (Saaho), राधे श्याम (Radhe Shyam), आदीपुरुष  (Adipurush), सलार (salaar) आणि आता कल्की (Kalki 2898 AD) अश्या वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे कसोटीवर उतरले. कल्की सिनेमा प्रभासच्या नावावर नाही तर फक्त अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या अश्वत्थामाच्या भूमिकेने तीन तास प्रेक्षकांना धरून ठेवणारा होता असं मला वाटतं, बाकी सिनेमा काय आहे कसा आहे यावर प्रकाश टाकूया.. 


कसा आहे कल्की?


जसं की आपण ट्रेलर टीझर मध्ये पाहिलं आहेच तसाच सिनेमाचा प्लॉट आहे. अगदी भविष्यवेधी पृथ्वीचं जिथं नॉर्मल मनुष्याला प्यायला पाणी आणि खाण्यास जेवण देखील मिळत नाही, तिथं शेवटचं आणि पहिलं शहर 'काशी.' काशीमध्ये सुप्रीम यास्कीनने एक कॉम्प्लेक्स उभं केलेलं असतं, जिथं हवं ते सगळं आहे. पण तिथं तो एका प्रोजेक्टवर काम करत असतो, सुप्रीमला हवं असलेलं सिरम सुमतीकडे असतं आणि सुमतीला अर्थात भूमातेला प्रोटेक्ट करायचं काम हे अश्वत्थामाकडे असल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्यामध्ये प्रभासचं भैरव पात्र उभं राहते. भैरवला  कॉम्प्लेक्समध्ये जायचं असतं आणि सुप्रीमसाठी तो काहीही करायला तयार असतो.
 
एव्हाना तुम्हा आम्हाला हे समजलं असेलच की महाभारताच्या मान्यतेनुसार सात चिरंजीव आहेत, हनुमान, बिभीषण, व्यास महर्षी, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, राजा बली हे अमर आहेत आणि आजही आपल्यात विविध रूपाने अस्तिवात आहेत. प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे. त्यापैकीच अश्वत्थामाच्या कथेला दिग्दर्शक नाग अश्विन (Nag Ashwin) याने याच कथेत उत्तमरित्या गुंफलं आहे.ज्यात, श्रीकृष्ण, कल्की, अर्जुन, कर्ण यांच्या पौराणिक कथांचं फलित  भविष्यात काय असेल 2898 AD मध्ये याचं उत्तम सादरीकरण केलेलं पाहायला मिळतं. प्रोजेक्ट 'के', भैरवची कॉम्प्लेक्स मध्ये जाण्यासही इच्छा, अश्वत्थामाचं कर्तव्य, सुमतीच्या पोटी असलेल्या भगवानचा जन्म होणार की सुप्रीम त्याच्या प्रयोगात यशस्वी होणार हे सगळं पाहण्यासाठी सिनेमा नक्की पाहायला हवा! 


काय काय पाहण्यासारखं आहे?


सिनेमा साधा नाहीये, एक ही Visual Treat आहे.  बाहुबली नंतर आलेल्या सिनेमापैकी प्रभासचा मला आवडलेला पहिला सिनेमा. 2898 AD मधील शेवटचं शहर, सिनेमाची एक एक फ्रेम ही सुंदर रित्या CGI, VFX द्वारे साकारण्यात आली आहे. यातूनच कळतं की निर्मितीवर पैसा किती खर्च झालाय. नेमाचा इंटरफेस, क्लायमॅक्स जबरदस्त आहे, अ‍ॅक्शन सुंदर आहे.


काय नाही आवडलं?


Background music साजेसं आहे.  मात्र एकुलतं एक गाणं कथेला पुढे घेऊन जातं, पण ते खास नाही. प्रभास साकारत असलेलं भैरव हे पात्र मात्र कॉमेडी असल्याचा प्रयत्न केलाय, मात्र तो फसल्यात जमा आहे. त्याच्या बुज्जी पार्टनर सोबतची नेटफ्लिक्सवरती सिरीज आलेली आहे ती पाहू शकता. क्लायमॅक्स धमाकेदार करण्यासाठी केलेल्या कथेची सुरुवात फर्स्ट हाफ हा प्रचंड संथ वाटतो, पण ते गरजेचं आहे.  


अभिनय कसा आहे?  


कल्की सिनेमात सर्वच पात्रं जबरदस्त आहेच, सर्वांचा अभिनय जोरदार आहे. अश्वत्थामाचं पात्र साकारलंय अमिताभ बच्चन यांनी शिवाय सुप्रीम (कमल हसन) फार थोड्यावेळ पडद्यावर येतात मात्र ते लक्षात राहतं,प्रभास, दीपिका आणि इतर सर्व देखील मजबूत अभिनयाची जोड देतात. 


किती स्टार?


एकंदरीत सध्या मार्केट मध्ये VFX, CGI चा बोलबाला आहे आणि दिग्दर्शकाला हवं ते चित्र उभं करण्यासाठी हे सगळं फायदेशीर आहेच. मात्र प्रभासचा बाहुबली, त्याचाच आदिपुरुष आणि आता कल्की, हे सिनेमे या दुनियेत काहीतरी नवा ट्रेंड घेऊन येत आहेत. पण दिग्दर्शकाचं व्हिजन महत्वाचं आहे. त्याशिवाय Science fiction सिनेमांमध्ये भारतीयांचा डंका वाजणार नाही. मी देतोय या सिनेमाला तीन स्टार!

विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!


कसा आहे आवेशम..?
'मुंज्या' ब्रह्मराक्षसाची हॉरर कहाणी!
मनुष्यप्राणी की भक्षक; वाचा रिव्ह्यू!
कसा आहे थ्री ऑफ अस?