'हा तो देश नाही जिथे मी मोठा झालो', नसरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर निशाणा, ज्येष्ठ अभिनेते स्पष्टच बोलले?
Naseeruddin Shah: मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमातून ऐनवेळी आपले नाव काढून टाकण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी स्वतःसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमातून ऐनवेळी आपले नाव काढून टाकण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच नकार
नसीरुद्दीन शाह यांनी या संपूर्ण प्रकरणावर इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून आपले मत मांडले आहे. या लेखात त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उत्सुक होते, कारण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांना संधी मिळणार होती. उर्दू विभागाने 1 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र 31 जानेवारीच्या रात्री त्यांना कळवण्यात आले की आता त्यांना कार्यक्रमाला येण्याची गरज नाही. यामागे कोणतेही कारण देण्यात आले नाही, तसेच माफीही मागण्यात आली नाही.
शाह यांनी आरोप केला की, नंतर विद्यापीठाने उपस्थितांना सांगितले की त्यांनी स्वतः येण्यास नकार दिला होता, जे पूर्णपणे खोटे होते. विद्यापीठाकडे साधं सत्य बोलण्याचे धैर्य नसावे, असेही त्यांनी म्हटले.
‘मी कधीच देशाबद्दल वाईट बोललो नाही’
अभिनेत्याने पुढे सांगितले की, विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ते देशविरोधी वक्तव्य करतात, असे सांगितल्याने त्यांना कार्यक्रमाला येण्यास नकार देण्यात आला. यावर शाह म्हणाले, “जर त्या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल, तर मी त्यांना आव्हान देतो की माझे एक तरी वक्तव्य दाखवावे, ज्यात मी देशाबद्दल वाईट बोललो आहे.” ते पुढे म्हणाले, “मी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका करतो आणि पुढेही करत राहीन. जे मुद्दे मला आणि माझ्यासारख्या लोकांना त्रास देतात, त्यावर मी आवाज उठवत आलो आहे.”
'तिरस्कार अखेर किती काळ?’
लेखाच्या शेवटी नसीरुद्दीन शाह यांनी प्रश्न उपस्थित केला. हा तिरस्कार अखेर किती काळ चालणार? “हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो आणि ज्यावर प्रेम करायला मला शिकवण्यात आलं. आज सर्वत्र नजर ठेवली जाते, विचारांवर पहारा आहे आणि तिरस्काराचं वातावरण आहे. जी तिरस्कार पूर्वी दोन मिनिटांची होती, ती आता 24 तासांची झाली आहे,” असे त्यांनी म्हटले. जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘1984’ या कादंबरीचा उल्लेख करत त्यांनी आजची परिस्थिती त्यासारखीच असल्याचा सांगत आज एखाद्या मोठ्या नेत्याचं कौतुक न करणंही देशद्रोह मानलं जात नाही का? प्रश्न उपस्थित केला. कामाच्या आघाडीवर पाहिल्यास, नसीरुद्दीन शाह गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी एका शायरची भूमिका साकारली होती. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अस्सी’चा समावेश आहे.
























