Marathi Director Sanjay Jadhav On Depression: 'दुनियादारी'चा दिग्दर्शक संजय जाधव डाऊनफॉलमुळे डिप्रेशनमध्ये कसा गेला? दोनवेळा आयुष्य संपवण्याचा विचार मनात आला, सगळं सांगून टाकलं
Marathi Director Sanjay Jadhav On Depression: दिग्दर्शक संजय जाधव नैराश्याच्या गर्तेत बुडाले. एवढे की, कधीकाळी मर्सिडीजमधून फिरणाऱ्या दिग्दर्शकाला लॉकडाऊननंतर त्याचं सगळं वैभव विकावं लागलं.

Marathi Director Sanjay Jadhav On Depression: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) आघाडीचे दिग्दर्शक (Marathi Director), सिनेमेटोग्राफर (Cinematographer) आणि निर्माते म्हणून ओळखलं जाणारं नाव म्हणजे, संजय जाधव (Sanjay Jadhav). वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमुळे त्यांनी इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः तरुणाईला आवडणाऱ्या विषयांवर त्यांनी अनेक सिनेमे बनवले. त्यांचा 'दुनियादारी' सिनेमा (Dunyadari Cinema) तर प्रचंड गाजला. पण, त्यानंतर मात्र, त्यांच्या वाट्याला हीट सिनेमाचा टॅग आला नाही. त्यानंतरचे बुहतेक सगळेच सिनेमे फ्लॉप ठरले. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत बुडाले. एवढे की, कधीकाळी मर्सिडीजमधून फिरणाऱ्या दिग्दर्शकाला लॉकडाऊननंतर त्याचं सगळं वैभव विकावं लागलं. नैराश्य एवढं वाढलं की, या दिग्दर्शकानं दोनवेळा स्वतःला संपवण्याचाही विचार केला.
मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना संजय जाधव यांनी त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाबाबत बोलले. कधीकाळी मर्सिडीज असलेल्या दिग्दर्शकाला लॉकडाऊननंतर सगळं विकावं लागलं आणि आयुष्याशी संघर्ष करावा लागला. याबाबत बोलताना दोनदा तर मला सगळं संपलं असं वाटलं, स्वतःला संपवून टाकावं असं वाटलं, असंही दिग्दर्शक संजय जाधव यांनी म्हटलं.
मराठी दिग्दर्शक संजय जाधव नेमकं काय म्हणाले? (Director Sanjay Jadhav On Flop Movies)
संजय जाधव यांनी नुकतीच 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यात बोलताना ते म्हणाले, "जेव्हा यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा मला एकटं वाटत नव्हतं. पण जेव्हा अपयश आलं, चित्रपट चालेनासे झाले, तेव्हा मला एकटेपणा यायला लागला... पण माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल, माझ्या आयुष्यात माझी काळजी करणारी माणसं आहेत... आजही सई ताम्हणकर (Sai Tamhankar) मला हक्कानं फोन करते की, तुझं सगळं ठीक चालूये ना, तू ठीक आहेस ना? आपण कॉफी प्यायला जाऊया का? आजही तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), उमेश कामत (Umesh Kamat), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांना काय बोलू मी. देवानं पाठवलेली माणसं आहेत. दोनदा मला सगळं संपलं असं वाटलं... स्वतःला संपवून टाकावं असं वाटलं... पण याच माणसांमुळे मी टिकलो..."
संजय जाधव पुढे बोलताना म्हणाले की, "ते लोक काय कमी बिझी आहेत का? पण ते माझ्या घरी येतात आणि मला म्हणतात, चल ना वडापाव खायला जाऊ... खूप वर्षांपासून ते असं करतायत... काय गरज पडली त्यांना... सोनाली खरे (Sonali Khare) ती तर अशीच सहज मला भेटते. मला कळत नाही का ते मला का भेटतात ते? माझ्याकडे मर्सिडीज होती. पण लॉकडाउननंतर मला सगळं विकायला लागलं... मी रिक्षाने फिरायचो. पण अमितराजनं (Amitraj) मला कधीच रिक्षाने जायला दिलं नाही. अमेय खोपकर (Ameya Khopkar), त्याचा पार्टनर ही जी माणसं आहेत ना, दादा आप लंडनकी फिल्म करोगे म्हणून मला लंडनला घेऊन गेले... कोण करतं असं?'
"नितीन देसाईंचं (Nitin Chandrakant Desai) सुसाइड झालं. कष्ट काही नसताना मला क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) फोन केलेला. मला कळत नव्हतं का, त्यानं का फोन केलेला? पण तो असं दाखवत होता की, नाही दादा आज ना इथे जायचं होतं आणि मला वाटलं की, वडापाव खाऊया. तर भेटूया जरा? मी उदाहरणं म्हणून ही नावं सांगितली. पण असे सगळे लोकं आहेत, इंडस्ट्रीमधले... इंडस्ट्रीमधल्या लोकांनी कधीच माझं वाईट नाही केलं. विश्वास ठेव. माझं वाईट माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे झालं. एक वेळ होती, जेव्हा मी सकाळी उठल्यापासून लोकांना शिव्या घालायचो... मी वाईट झोनमध्ये होतो. पण त्या लोकांनी माझी संगत सोडली नाही. तेजुनं तर मला इतक्या घटनांमधून बाहेर काढलंय ना... कुठल्या मातीची बनलीयेत ही माणसं काय माहीत...", असं संजय जाधव म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...





















