बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
रात्रभर खान याची चौकशी केल्यानंतर त्याने पहाटेच्या सुमारास गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Mumbai: सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असणारा बॉलिवूड अभिनेता कमाल राशीद खान याने मागील रविवारी आपल्याच राहत्या सोसायटीत गोळीबार केला आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला. या प्रकरणी नुकतेच मुंबई पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. अभिनेता कमाल खान (Kamal Khan) याला शनिवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मागील रविवारी नालंदा सोसायटीत झालेल्या गोळीबार प्रकरणी चौकशी केली. रात्रभर खान याची चौकशी केल्यानंतर त्याने पहाटेच्या सुमारास गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
नेमका प्रकार काय आहे?
मुंबईतील ओशिवरा परिसरात असलेल्या नालंदा सोसायटीत मागील रविवारी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला आणि त्यानंतर सोसायटीतील सगळेच नागरिक हादरून गेले. विशेष बाब म्हणजे नेमकी गोळी कुणी आणि कुठून चालवली याची माहिती समोर न आल्याने नागरिकामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल. याच सोसायटीत बॉलिवूड मधे काम करणारी एक मॉडेल, प्रतिष्ठित लेखक आणि कमाल खान राहत असल्यामुळे याकडे माध्यमांच लक्ष गेलं
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवली आणि एक तांत्रिक तपासासाठी टीम देखील तयार केली. साधारणपणे आठवडा भर घटनेतील विविध अँगल तपासल्यानंतर या प्रकरणात कमाल खान याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी शनिवारी रात्री खान याला चौकशीसाठी बोलावलं. पोलिसांनी रात्रभर खान याची चौकशी केली आणि त्या चौकशीत त्यांनेच गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं. खान याने पोलिसांना सांगितलं की आपण परवानाधारक आपली बंदूक साफ करत होतो ती व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण खारफुटी असलेल्या दिशेने गोळीबार केला. त्यावेळी हवा प्रचंड असल्याने गोळीची दिशा बदलली आणि ती शेजारच्या सोसायटीवर जाऊन आदळली. या संपूर्ण प्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत असून खान याचा काही घातपाताचा तर डाव नव्हता ना याचा तपास सुरू आहे. कोर्टाने देखील खान याला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अभिनेत्याचे वकील नागेश मिश्रा यांनी केलेल्या युक्तिवादानुसार ही अटक चुकीच्या पद्धतीने केली आहे. अटकेपूर्वी नोटीस देणे अपेक्षित होतं ते देखील केलेलं नाही. कोर्टात सुनावणी दरम्यान खान यांच्या वकिलांनी अटक चुकीच्या पद्धतीने असल्याचा युक्तिवाद केला आहे. कमाल खान यांचा बंगला आणि ज्या सोसायटी मधील फ्लैटवर गोळीबार झाला त्याच अंतर ४०० मीटर आहे. कमाल खान यांच्याकडे हे पिस्तुल आहे त्याची रेंज ही केवळ २० मीटर आहे त्यामुळे जो नालंदा सोसायटी मधे गोळीबार झाला आहे तो कोणी अज्ञात व्यक्ती असेल त्याचा पोलीस तपास करत आहे. अशी माहिती दिली त्यामुळे आता खरच कमाल खान यांनी गोळीबार केला होता की त्यांना अडकवण्यात येत आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

























